मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला
प्रतिनिधी /पणजी
बंगालची खाडी, ओडिशा आणि आंध्रप्रदेशच्या किनारी भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे गोव्यात ‘एलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
13 ते 15 सप्टेंबर असे तीन दिवस हा पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे. बंगालच्या खाडीत पूर्वमध्य आणि उत्तरपूर्व भागात हा कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून पुढील 48 तासात तो ओडिशा आणि आंध्रप्रदेशच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे.
या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे समुद्रात ताशी 40 ते 50 किमी वेगाने जोरदार वारे वाहणार असून समुद्र प्रचंड खवळलेला असेल. त्यामुळे पुढीस सूचना मिळेपर्यंत मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन वेधशाळेने केले आहे. अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेता राज्य आपत्ती निवारण कक्ष तसेच अग्निशामक दलानेही दक्ष रहावे, असे आदेश देण्यात आले आहेत.