शिवसेना राज्यप्रमुख जितेश कामत यांचा दावा : ऑक्सिजन कमतरतेमुळे गोमेकॉतील मृत्यू प्रकरण
प्रतिनिधी /पणजी
विद्यमान प्रमोद सावंत सरकार राज्यातील लोकांशी खोटारडेपणा करते हे सर्वश्रूत असतानाच हे सरकार आता केंद्र सरकार आणि खुद्द पंतप्रधान कार्यालयासही खोटी माहिती देऊन खोटारडेपणा करत असल्याचे उघडकीस आले आहे, असा दावा शिवसेने राज्यप्रमुख जितेश कामत यांनी केला आहे. लाखो करोडो मेले तरी चालतील, पण भाजप सरकार सत्तेत राहिले पाहिजे, या तत्वावर हे सरकार चालत आहे, अशी टीकाही कामत यांनी केली आहे.
पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यात कोरोनाकाळात ऑक्सिजन कमतरतेमुळे गोमेकॉत झालेल्या मृत्यूंची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी करणारे पत्र कामत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविले होते. त्यानुसार पंतप्रधान कार्यालयाने गोमेकॉत झालेल्या दुर्दैवी मृत्यूंविषयी चौकशी केली असता पहाटे 2 ते 6 दरम्यान असे काही घडलेच नसल्याची खोटी माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे सदर तक्रार खोटी असून चौकशी बंद करत असल्याचे पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या उत्तरात तसे स्पष्ट केले आहे, अशी माहिती कामत यांनी दिली.
सदर मृत्यू प्रकरणी न्यायालयात जनहित याचिकेवर सुनावणी सुरू असून हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने आपण जास्त काही टिप्पणी करू शकत नाही, असे ते म्हणाले. पंतप्रधानांना पाठविलेल्या पत्रासोबत आपण विविध वर्तमानपत्रांची कात्रणेही जोडली होती. त्याशिवाय स्वतः आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनीही सदर प्रकरणी न्यायालयीन चौकशी करण्याची तोंडी मागणी केली होती. अशावेळी तक्रारदाराला खोटे ठरविणे म्हणजे अप्रत्यक्षपणे वर्तमानपत्रांना आणि स्वतःच्या मंत्र्यालाही खोटे ठरविण्यासारखाच हा प्रकार असल्याचे कामत म्हणाले.
दरम्यान, एका प्रश्नाला उत्तर देताना येत्या विधानसभा निवडणुकीत शिवसेन किमान 25 जागा लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले. युतीत शिवसेनेला कमी लेखत नको त्या जागा देण्याची प्रथा गोव्यात आहे. त्यामुळे यंदा आम्ही कुणाशीही युती करणार नाही, असे आपण खासदार संजय राऊत यांना कळविले असून त्यांनी ते मान्यही केले असल्याचे ते म्हणाले. पत्रकार परिषदेस सरचिटणीस मिलिंद गावस, राज्य सरचिटणीस मंदार पार्सेकर व महेश पेडणेकर यांची उपस्थिती होती.
भाजप कार्यकर्ते गुरुदास गांवकर यांनी सोमवारी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांचे निकटवर्तीय रामा राणे, सागर सावंत आणि प्रशांत सावंत यांनी आणि म्हापसा येथील उद्योजक वासिम शेख यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. जितेश कामत यांनी त्या सर्वांचे स्वागत केले.
दरम्यान, सत्तरी तालुका प्रमुख अर्जुन घाडी यांची जिल्हा सचिवपदी तर संजय सावंत यांची मये मतदारसंघ प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा यावेळी करण्यात आली.