प्रतिनिधी / अक्कलकोट
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे 31 मेपर्यंत कडकडीत लॉकडाउनचे आदेश आहेत. तरीही विनापरवाना तीनशे ते साडेतीनशे वऱ्हाणीचा जमाव जमवून विवाह करणाऱ्या रामपूर येथील कुटुंब प्रमुखाला पन्नास हजारांचा दंड करण्यात आला.
ही कारवाई वळसंग पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी रविवारी केली. जिल्ह्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत असल्याने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी 31मे अखेरपर्यंत कडकडीत लॉकडाउनचे आदेश देऊन सार्वजनिक कार्यक्रमांसह यात्रा, जत्रा, उरुस करण्यावर बंदी घातली आहे. यात विवाह, साखरपुडा यासह घरगुती कार्यक्रमांचाही समावेश आहे. असे असतानाही दक्षिण सोलापूर तालुक्यातील रामपूरमध्ये नियमबाह्य लग्न समारंभ सुरू होता. याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांना मिळताच त्यांनी धाड टाकून हा विवाह सोहळा रोखला.
कुटुंब प्रमुख मल्लिकार्जुन महादेव सोनटक्के यांना 50 हजाराचा दंड आकारला. घटनास्थळी पोलीस पोहचताच जमलेले पाहुणे सैरावैरा धावत सुटले. 25 जणांची उपस्थिती आवश्यक असताना विवाहस्थळी तीनशे ते साडेतीनशे नागरिक उपस्थित होते. ही कारवाई पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वळसंग पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अतुल भोसले यांच्यासह पथकातील पोलीस उपनिरीक्षक स्वामीराव पाटील, सहाय्यक फौजदार शरणाप्पा मंगाणे, संजय जमादार, सूर्यकांत बिराजदार, मंथन सुळे, लक्ष्मण काळजे यांनी केली.
जिल्ह्यातील पहिली कारवाई
वळसंग पोलिस ठाण्याच्या हद्दीतील 35 गावांसह विडी घरकुल परिसरामध्ये पोलीस निरीक्षक अतुल भोसले हे स्वतः गस्त घालत आहेत. या गस्तीच्या वेळी त्यांना अवैध धंद्यासह इतर माहितीही मिळत आहे. या माहितीच्या बळावरच रामपूर येथील बेकायदेशीर लग्नकार्य रोखण्यात यश मिळाले आहे. कारवाईप्रसंगी स्वतः अतुल भोसले यांचा सहभाग होता. वळसंग पोलिसांनी केलेली ही जिल्ह्यातील पहिली कारवाई आहे.