कोरोना येवो किंवा काय वाटेल ते होवो, ऋतुचक्र कुणासाठीच थांबत नाही. वसंत यायचा म्हणता आला. होळी गेली. पाडवा यायचा त्याच दिवशी आला. घरातल्या घरात तो साजरा झाला. घराघरात गुढय़ा उभारल्या गेल्या. सगळे काही झाले. अजून एक गोष्ट आहे. तीही जणू काही एखादी रुढी परंपरा असावी तशी पाळलेली आहे. त्याच सहज प्रतिक्षिप्त क्रियेने ती केली गेली यंदाही. कुठे ती सीडी लावून झाली तर बऱयाच मोबाईलवर आणि पीसी लॅपटॉपवर आणि टॅबवर झाली. तिच्याशिवाय पाडवा साजरा होतच नाही मराठी माणसाचा. अगदी कितीही माडर्न असू देत तो. पण ती रुढी पार पाडणारच! कोणती माहीत आहे का? बहुतेकांनी वाचता वाचता ओळखलेच असेल. रामकथेची परंपरा. पाडवा साजरा होतो तो प्रभु रामचंद्रांच्या स्मरणाने आणि आराधनेने. आणि मराठी माणसाचा जीव ज्यावर कायमचाच जडलेला आहे ते म्हणजे सीताकांत लाड, गदिमा आणि बाबूजी सुधीर फडके या त्रयीने रचलेला अमर इतिहास अर्थात ‘गीत रामायण’. समाजाला इतर काहीही देणाऱया व्यक्तीपेक्षा समाजाला गाणे देणाऱया व्यक्तीचे उपकार मोठे असतात असे पु. ल. देशपांडे म्हणून गेले आहेत. आपल्या सर्वांवर या मंडळींचे उपकार किती मोठे असतील?
जोवरि हे जग जोवरि भाषण तोवरी नूतन नित रामायण
हे गदिमांचे उद्गार काही उगाच प्रसवलेले नव्हेत हे खासच आहे. रामायण असो किंवा रामचरितमानस असो, ते कधीही ऐका नवीनच वाटते. सध्या दूरदर्शनवर रामानंद सागर प्रस्तुत ‘रामायण’ ही गाजलेली मालिका पुनःप्रसारित होत आहे.
सीतारामचरित अति पावन मधुर सुरस अरु अतिमनभावन
या ओळी ऐकू येऊ लागल्या की आपोआपच मनात भक्तिभाव दाटून येतो. खरोखरच जर रामाची ही कथा गेयरचनेत नसती तर नुसत्या कथेने ती एवढी पोहोचली असती का हो आपल्यापर्यंत इतक्मया तीव्रतेने? त्यात अतीव करुण असलेले अनेक प्रसंग आहेत. त्यातली आर्तता त्यात असलेल्या गाण्यामुळे अधिकच भिजवून सोडते आपले मन. रामायण असे हर तऱहेने आपल्यापर्यंत गेली हजारो वर्षे पोहोचत आले आहे. प्रभु रामचंद्रांचे माहात्म्य वादातीतच आहे. साक्षात परमेश्वराचा अवतार तो. पण ते चरित्र पुढे पुढे पोचवण्यासाठी वाहक म्हणून मात्र गाणेच आहे पुनः पुन्हा. मूळ रामायण हे श्लोक रूपात आहे. म्हणजे चालीवर म्हणणे आलेच. आणि चाल म्हणजे स्वर. म्हणजे परत गाणेच. त्यात संतकवी तुलसीदास असोत किंवा मोरोपंत असोत. अगदी आपले आधुनिक वाल्मिकी गदिमा असोत. गेय रचना म्हणजे गीत मग त्याचे गाणे व्हायला कितीसा वेळ लागणार? शब्द धावत सुटले सुरांकडे! पण ही झाली या क्षेत्रातली अगदी ठळक झगझगीत उदाहरणे. पण आमचे रामराया स्वरतालाच्या जडावाचे दागिने घालून आणि सीतामाईला संगती घेऊन कुठे कुठे भेटतात माहिती आहे? चक्रावून जाल सहज बघितले तर!
सुश्लोक वामनाचा। अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची।
ओवी ज्ञानेशाची। आणि आर्या मयूरपंतांची।
अशा असंख्य आर्या कीर्तनात आपल्या मजबूत सुरेल आवाजात सादर करणारे कीर्तनकार त्या त्या आर्येच्या शेवटी ‘रामा रामा हरे हरे रामा।़।़।़ रा।़मा, रामा रामा सीतापते रामा अशी आर्जवी आळवणी करतात ना तेव्हा ‘हे नारदा जिथे माझे भक्त माझे गायन करत असतात, तिथेच मी ति÷त उभा असतो’ असे त्या देवानेच नारदमुनींना दिलेले (आणि कीर्तनातच ऐकलेले) उत्तर आठवते. तर कधी रेडिओवर लागणारे राम श्याम गुणगान आठवते. ‘राम का गुणगान करिये’ चे स्वर लतादीदी आणि पं. भीमसेन जोशी अशा दोन भारतरत्नांच्या तोंडून ऐकले की थरारून जायला होते. रामराया आणि गाण्याचे हे असे अनुबंध… ओव्या, पारंपरिक स्त्रीगीते यातही रामराया नि सीतामाई संसार करत असतात. अगदी मंगळागौरीची गाणी गातानाही
आळुंकी साळुंकी। तुझी माझी पालखी
रामाची जानकी। पगडा फू सई पगडा फू
किंवा
पहिली माझी ओवी। पहिला माझा नेम
तुळशीखाली राम। पोथी वाची।
किंवा
राम म्हणू राम। साखरेचा ताजा रवा
राम हुरद्यात जवा तवा।
यासारखी ग्रामीण गीते ऐकली की त्या म्हणणाऱया गळय़ाचा तो नैसर्गिक ग्रामीण ढंग म्हणजे अगदी लोकवाणीतला रामराया. डॉ. सरोजिनी बाबर यांनी फार सुरेख लेखन केले होते यावर. सगळा लोकगीतांचा प्रवास मांडला होता. गाण्यातला राम आणि रामाचे गान हे म्हणजे अगदी गोफाची वीणच जशी असे सुरेख लेखन होते त्यांचे. असा रामराया ठायी ठायी भेटत असतो गाण्यात! ‘स्मरत मनी राम गौरीहराला, गिरिजावराला शिवशंकराला’ आणि ‘परिसा हो तुलसी रामायण’ ही दोन गाणी आमच्या गावातले कै. बंडूकाका ताम्हनकर अतिशय सुंदर म्हणत असत. गाणी तर ती छानच आहेत. पण त्या गाण्यांची आठवण आमच्या बंडूकाकांशी जोडलेली आहे. दर रामनवमीला बंडूकाकांच्या सुरातला भक्तिभाव आठवून गळा दाटून येतो. रामाला आवडला त्यांचा भक्तिभाव. म्हणूनच त्याने लवकर नेले असावे त्यांना. असो. शास्त्रीय संगीतामध्येही रामाशिवाय तरणोपाय नसावा बहुधा.
जागे जागे मोरे भाग अचानक।
रामचंद्र प्रभु के दरस पाये।
जानकीनाथ चरण पतितपावन।
तनमनधन करहुँ नौछावर।
अशी मालकंसातली रचना जेव्हा मला शिकवण्यात आली तेव्हा तिच्या नेटक्मया बांधणीमुळे असेल किंवा माझ्या शब्दवेडामुळे असेल, शब्दांकडेही तितकेच लक्ष जात होते. अशी आठवायची म्हटली तर पं. संजीव अभ्यंकर यांचे ‘ध्यान लागले रामाचे’ पासून ते अनुदिनी अनुतापे तापलो रामराया, रामा रघुनंदना, काल मी रघुनंदन पाहिले, घडि घडि घडि स्मरण तुझे आठवते रामा, विजय पताका श्रीरामाची झळकते अंबरी ते आताच्या सूर्यागायत्रीने गायलेले ‘श्रीरामचंद्र कृपालु भज मन’ अशा रामगानलहरी संपणारच नाहीत. पण माझ्या कायम लक्षात राहणारे एक रामगीत आहे. जे सिनेमात राजाभाऊ गोसावी यांच्या तोंडी आहे आणि चित्रपटाची सुरुवात तिथूनच होते. पण ते जितक्मया वेळा ऐकले तितक्मया वेळा मी अश्रू आवरू शकत नाही. ते म्हणजे
राम भजन कर लेना रे
इक दिन जाना रे भाई
खडबडून जागे करणारे ते गाणे कायम जाणवून देते की गाण्यातला राम दिसायचा असेल तर रामाचे गान आधी शोधायला आणि गायला हवे, तरच आयुष्यात राम राहील.
अपर्णा परांजपे-प्रभु