महाराष्ट्रातील सर्वाधिक 5 जणांना पुरस्कार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
विशेष शौर्य गाजविणाऱया 18 वर्षाखालील मुलांसाठी दिला जाणाऱया राष्ट्रीय बाल शक्ती पुरस्कार विजेत्यांची नावे सोमवारी जाहीर करण्यात आली असून त्यात सर्वाधिक 5 पुरस्कार महाराष्ट्रातील मुलांना जाहीर झाले आहेत. यंदा बाल शक्ती पुरस्काराच्या विविध प्रकारांतर्गत देशभरातून 32 मुलांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशात विविध पुरस्कारांची घोषणा केली जाते. त्यानुसार विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कौतुकास्पद कामगिरी नोंदवणाऱया बालचमूंना राष्ट्रीय बाल शक्ती पुरस्कार जाहीर होतो. यंदा कला व संस्कृती क्षेत्रात 7 पुरस्कार, नाविन्यपूर्णतेसाठी 9 तर, शैक्षणिक कामगिरीसाठी 5 पुरस्कार देण्यात आले आहेत. पुरस्कार्थींच्या यादीनुसार कामेश्वर जगन्नाथ वाघमारे (शौर्य), श्रीनाभ मौजेश अग्रवाल (नवनिर्माण), अर्चित राहुल पाटील (नवनिर्माण), सोनित सिसोलेकर (शैक्षणिक), काम्या कार्तिकेयन (क्रीडा) यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच कर्नाटकातील राकेशकृष्ण के (नवनिर्माण) आणि वीर कश्यप (नाविन्य) यांचाही पुरस्कार्थींमध्ये समावेश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी दुपारी बाल पुरस्कार विजेत्यांशी दुपारी साडेबारा वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यादरम्यान पंतप्रधान मोदींनी सर्व बाल पुरस्कार विजेत्या मुलांचे अभिनंदन केले. तुमच्याप्रमाणे मीसुद्धा तुम्हाला भेटायला वाट पाहत होतो, परंतु कोरोनामुळे आमची व्हर्च्युअल बैठक होत आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे 63 वर्षात प्रथमच प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये शूर-वीर मुले सहभागी होत नसल्याबद्दल त्यांनी स्पष्टीकरण दिले. यावेळी केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्री स्मृती इराणी या उपस्थित होत्या. राष्ट्रीय बाल पुरस्कार अपवादात्मक कामगिरीसाठी आणि नाविन्य, क्रीडा, कला, संस्कृती, शौर्य आणि समाजसेवा अशा विविध क्षेत्रातील कामगिरीसाठी देण्यात आला आहे.
तुमच्यापासून देश प्रेरणा घेईल !
कोरोनाने निश्चितपणे सर्वांना प्रभावित केले आहे. या साथीच्या आजारावर देशातील भावी पिढीने लढा देण्यासाठी मोठी भूमिका बजावली आहे, असे पंतप्रधान म्हणाले. तसेच मुलांच्या कामगिरीचे कौतुक करताना तुमच्या यशाने अनेकांना प्रेरणा मिळाली. आपले मित्र, सहकारी आणि देशातील अन्य मुले, जे आपणास दूरदर्शनवर पाहत आहेत, तेदेखील तुमच्याकडून प्रेरणा घेतील, असा आशावादही पंतप्रधानांनी व्यक्त केला. या बैठकीपूर्वी पंतप्रधानांनी एनसीसी कॅडेट्स, एनएसएस कार्यकर्ते आणि प्रजासत्ताक दिनाच्या परेड कार्यक्रमात उपस्थित कलाकारांना संबोधित केले.