नागपूर/प्रतिनिधी
राज्यसभेत घडलेला प्रकार संसदेच्या इतिहासातील कलंकित घटना आहे. अधिवेशनादरम्यान सरकारने सभागृहात अनेकदा चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, विरोधकांनी सातत्याने गोंधळ घालून कामकाज बंद पाडले. दरम्यान, पेगॅसस प्रकरणी विरोधकांनी राज्यसभेत बुधवारी जोरदार गोंधळा घातला. यावेळी महिला खासदारांना मार्शलनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे. या प्रकारावरून काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी काल निषेध केला. दरम्यान, सत्ताधारी आणि विरोधी पक्षाकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात असताना मंत्री रामदास आठवले यांनी सर्व प्रकाराबाबत राहुल गांधींना जबाबदार धरत त्यांना लोकसभेतून वर्षभरासाठी निलंबित करा अशी मागणी केली आहे.
राज्यसभेत नुकत्याच घडलेल्या धक्काबुक्कीचा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याप्रकरणी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना रिपाईचे सर्वेसर्वा आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना एका वर्षासाठी संसदेतून निलंबित करा, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, या व्हिडिओनंतर विरोधकांकडून संसदेत घालण्यात आलेल्या गोंधळाविषयी उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.
प्रसारमाध्यमांशी बोलताना आठवले यांनी राहुल गांधी यांना लक्ष्य केले. राज्यसभेत घडलेला प्रकार संसदेच्या इतिहासातील कलंकित घटना आहे. अधिवेशनादरम्यान सरकारने सभागृहात अनेकदा चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, विरोधकांनी सातत्याने गोंधळ घालून कामकाज बंद पाडले. राहुल गांधीही चुकीच्या पद्धतीने वागले आहेत. यासाठी त्यांना वर्षभरासाठी सभागृहातून निलंबित केले पाहिजे, असे मत रामदास आठवले यांनी मांडले.