पंतप्रधान मोदींचा अधिकाऱयांना महत्वपूर्ण आदेश
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये असलेली रिक्त पदे त्वरित भरण्याच्या दिशेने नोकरशहांनी पावले उचलावीत, असा स्पष्ट आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोकरशहांना दिला आहे. सरकारी विभागांनी जास्तीत जास्त नोकऱया निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. नवे रोजगार तयार होण्याची नितांत आवश्यकता आहे. त्यादृष्टीने योजना आखाव्यात, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
तरुणांना रोजगार देणे हे कर्तव्याचे आहे. त्यासाठी प्रथम केंद्र सरकारची रिक्त पदे भरली जावीत. त्यासाठी लवकर परीक्षा आणि निवड प्रक्रिया सुरु करावी. सध्या केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये 8.7 लाखांहून अधिक पदे रिकामी आहेत. ती भरली गेल्यास प्रशासनालाही वेग येणार असून तरुणांना नोकऱया मिळणार आहेत. त्यामुळे यापुढे यासाठी योजना आखून काम करावे, अशी सूचना त्यांनी केली. रविवारी त्यांनी तब्बल चार तास सरकारी अधिकाऱयांशी चर्चा केली.
यांत्रिकपणा नको, संघभावना हवी
उच्च पदांवरील अधिकाऱयांनी प्रशासनातील त्रुटी स्पष्टपणे माझ्यासमोर मांडाव्यात. केवळ ‘हो ला हो’ अशा पद्धतीने सर्व बाबी यांत्रिकपणे मान्य करु नयेत. तसेच केवळ आपल्या विभागापुरते पाहून काम करु नये. विविध विभागांच्या अधिकाऱयांनी एकत्र येऊन संघभावनेने धोरणे ठरविली पाहिजेत. ती ठरवत असताना आपल्या विभागाशी संलग्न असलेल्या इतर विभागांचेही भान त्यांनी ठेवले पाहिजे. प्रशासनात प्रत्येक विभागाचे स्वतंत्र बेट तयार होता कामा नये. सर्व उच्च अधिकाऱयांना त्यासाठी एकत्रितरित्या काम करावे लागेल असेही त्यांनी स्पष्ट केले.
सचिवांनी दौरे करावेत
विविध केंद्रीय विभागांच्या सचिवांनी देशभरात दौरे करावेत. सरकारी योजनांच्या कामांची आणि प्रगतीची प्रत्यक्ष पाहणी करावी. प्रत्येक प्रकल्प वेळेआधी पूर्ण होईल, याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. योग्य त्या सूचना कराव्यात. व्यापक विचार करुन तशीच कृती करावी. केवळ आवश्यकतेपुरते काम असा खाक्या असू नये. अधिक जबाबदारी स्वेच्छेने घ्यावी, अशा विविध आणि उपयुक्त सूचना त्यांनी केल्या.
गरीबीचे उदात्तीकरण नको
गरीबी कुरवाळत बसण्याची मानसिकता आता आपण सोडली पाहिजे. भारत हा गरीब देश आहे, अशा प्रकारे जगात भारताचे मार्केटिंग होता कामा नये. तसे करण्याची आवश्यकता नाही. गरीबीचे उदात्तीकरण भारतात गेली अनेक दशके चाललेले होते. त्यामुळे आपली मानसिकता नकारात्मक बनली आहे. सरकारी विभागांनी महत्वाकांक्षी आणि विशाल प्रकल्पांची निर्मिती केली पाहिजे. जगाला भारताची भव्यता आणि सामर्थ्य दिसेल अशा प्रकारे योजनांचे क्रियान्वयन करण्याचे आपल्या सरकारचे ध्येय आहे. केवळ ‘जैसे थे’ किंवा आहे त्यात समाधान मानण्याच्या प्रवृत्तीने प्रगती होणार नाही, असेही खडे बोल त्यांनी सुनावले.