प्रतिनिधी / सातारा :
दररोज शाळेत न्यायला येणारे रिक्षावाले काका लॉकडाऊनच्या काळात काय करत असतील. त्यांचे घर कसे चालत असेल, हा लहानग्या मुलांपुढे प्रश्न होता. गुरुकुलच्या लहानग्या चिमुकल्यांनी याच रिक्षावाल्या काकांसाठी, बसवाल्या अंकलसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. चिमुकल्यांनी आपल्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून त्यांना मदत केली.
गतवर्षी सुद्धा लॉकडाऊनच्या काळात बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष व गुरुकुलचे उपाध्यक्ष राजेंद्र चोरगे यांच्या संकल्पनेतून गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी लक्ष्मीटेकडी झोपडपट्टीतील गोरगरीबांना धान्य दिले होते. कोरोनाचे संकट प्रत्येकावर आलेले आहे. त्या संकटामध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. काहींजण काम नसल्याने घरीच आहेत. गतवर्षी जी स्थिती होती तीही याच ब्रेक द चैनमध्ये झालेली आहे. त्यामुळे याचाच फटका बसलेले जे शाळेत मुलांना सोडायला येतात ते रिक्षावाले काका काय करत असतील. बसवाले अंकल काय करत असतील या नुसत्या कल्पनेने अंगावर काटा उभा रहातो. बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे यांनी गुरुकुलच्या विद्यार्थ्यांकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन केले होते. त्यानुसार विद्यार्थ्यांनी व पालकांनी स्वच्छेने रिक्षावाले काका, बसवाले अंकल यांना मदत केली.
गुरुकुल स्कूलमध्ये पहिलीत शिकणारा सर्वेश समाधान घार्गे याने पाच हजार रुपये व एक महिन्याचे धान्य तसेच चौथीत शिकणाऱ्या देव व दिया राजेंद्र खंडेलवाल यांच्या पालकांनी तीन हजार रुपये वाढदिवसाच्या खर्चास फाटा देत तसेच ज्युनिअर केजीतील अर्णव व पहिलीतील अर्णवी विजय पाठक यांनी दोन हजार रुपये स्कूलकडे सुपूर्द केले. उर्वरीत रक्कम राजेंद्र चोरगे यांनी दिली व महाराष्ट्र दिनाच्या दिवशी 30 व्हॅन अंकल यांना धान्याचे किट वाटप केले असून आतापर्यंत 5 वेळा धान्य किट उपलब्ध करून देण्यात आले आहे.
पालक व विद्यार्थ्यांनी ही आपली घरातील जबाबदारी समजून शक्य ती मदत बस अंकल यांच्यासाठी करावी, असे मत चोरगे यांनी यावेळी पुन्हा व्यक्त केले. गतवर्षीही राजेंद्र चोरगे यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी मुठभर धान्य गोळा करुन ते गोळा झालेले धान्य लक्ष्मी टेकडी झोपडपट्टीतील गोरगरीबांना वाटले होते.