मेढा ग्रामीण रुग्णालयासमोरची घटना, व्हेंटिलेटरअभावी गेला हकनाक बळी,
वार्ताहर / कुडाळ
जावली तालुक्यामध्ये मेढा येथे कोरोनाने हाहाकार माजवला आहे. दोनशे रुग्णांचा टप्पा गाठत असताना मेढय़ांमध्ये शनिवारी ग्रामीण रुग्णालयासमोर व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनअभावी एका परराज्यातील कोरोना बाधित रुग्णाने रिक्षामध्येच आपला जीव सोडला. तब्बल तीन तास ग्रामीण रुग्णालय मेढाच्या पोर्चमध्ये रिक्षामध्ये हा मृतदेह निपचित पडून होता. या घटनेमुळे येणाऱया-जाणाऱयांच्या काळजाचा ठोका चुकत होता. मात्र यामुळे आरोग्य विभागाचे धिंडवडे काढले जात होते.
मेढा येथील रिक्षामध्ये पडून राहिलेला मृतदेह पाहून ये-जा करणारे नागरिकांना एकच प्रश्न होता की, हा मृतदेह कोणाचा आहे. नंतर हा मृतदेह एका परप्रांतीय मजुराचा असल्याची माहिती समोर आली. गेल्या काही दिवसापासून याला कोरोनाची बाधा होऊन त्रास सुरू झाला होता. अखेर ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची आवश्यकता ज्यावेळेस भासली, त्यावेळेस तत्काळ त्याला मेढा येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये त्याचे सहकारी घेऊन आले. पण व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन न मिळाल्याने त्याने मेढा येथील ग्रामीण रुग्णालयाच्या पोर्चमध्ये आपला जीव सोडला. हा सर्व भयानक प्रकार होत असताना त्याच्या मदतीलादेखील कोणी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचारी अधिकारी धावला नसून रुग्णवाहिकाही आली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता शहरातच नव्हे तर ग्रामीण भागात देखील, अशी परिस्थिती निर्माण होऊ लागल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे.
मेढय़ांमध्ये वाढती कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता आरोग्य विभाग मात्र याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे शहरांमध्ये हे भलेही कोरोनाच्या योजनाबाबत गांभीर्याने घेतलं असलं तरी ग्रामीण भागात मात्र अशी परिस्थिती दयनीय झाली आहे. जावली तालुक्यातील पुनवडी गावाचा कोरोनाचा थरार अजून देखील विसरला नाही, त्यात मेढा येथे कोरोना रुग्णाचे द्विशतक होण्याची वेळ आली तरी जिल्हा प्रशासन मात्र अद्याप देखील ग्रामीण भागात लक्ष देण्यास तयार नाहीत. आता कोरोनाचे रुग्ण रुग्णालयाच्या दारात मरु लागले आहेत. तरीदेखील अद्ययावत यंत्रणा ग्रामीण भागात उपलब्ध होत नाही. यानंतर या पेक्षाही भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. एकीकडे जिह्यातच ऑक्सीजन व्हेंटिलेटरची कमतरता आहे. त्यात दुर्गम डोंगराळ आरोग्य विभागाबाबत कायमस्वरूपी दुर्लक्षित असलेला जावली तालुक्यामध्ये सध्या सातारा जिह्यात सगळ्यात जास्त कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने या दुर्गम डोंगराळ भागातसाठी लोकप्रतिनिधी व जिल्हा प्रशासनाने तात्काळ अद्यावत यंत्रणा उबारावी, अशी मागणीदेखील नागरिकांमधून होत आहे.