प्रतिनिधी/ वास्को
रेल मार्ग दुपदरीकरणासाठी भू संपादन करण्या करीता सुरू करण्यात आलेली वैयक्तीक सुनावणीची प्रक्रिया विरोधकांच्या दबावामुळे प्रशासनाला तात्पुरती रद्द करणे भाग पडले. मात्र, सोमवारची सुनावणी रद्द करण्यात आली तरी येत्या 27 पर्यंत होणाऱया सुनावण्याही रद्द करण्यात याव्यात अशा मागणीसाठी रेलमार्ग दुपदरीकरण विरोधी काँग्रेस कार्यकर्ते व सामाजीक संघटनांनी मुरगावच्या उपजिल्हाधिकाऱयांच्या कार्यालयासमोर संध्याकाळी उशिरापर्यंत धरणे धरून निदर्शने केली.
कासावली, वेलसाव व इतर भागातील जमीन रेलमार्ग दुपदरीकरणासाठी ताब्यात घेण्यात येणार असल्याने प्रशासनाने यासंबंधी संबंधीत काही जमीन मालकांना वयक्तीक सुनावणीसाठी मुरगावच्या उपजिल्हाधिकाऱयांच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितलेले आहे. काल सोमवारपासून या प्रक्रियेला प्रारंभ झालेला असून येत्या दि. 27 पर्यंत सुनावणीची ही प्रक्रिया चालू राहणार आहे. त्यामुळे रेलमार्ग दुपदरीकण आणि गोव्यात कोळसा नको अशी मागणी करणाऱयांनी संघटनांनी जमीन ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेला विरोध करण्यासाठी आपापल्या समर्थकांसह मुरगावच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर गर्दी केली होती. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संकल्प आमोणकर तसेच जर्नादन भांडारी, वरद म्हार्दोळकर व त्यांचे इतर पदाधिकारी तसेच कार्यकर्ते या विरोधासाठी आघाडीवर होते. मोठय़ा संख्येने जमलेल्या या विरोधकांकडून सरकारविरोधी व मंत्र्यांविरोधी घोषणा देण्यात आल्या. गोव्याच्या रक्षणाच्याही घोषणा त्यांनी दिल्या. वास्को, मुरगाव, दाबोळी, कुठ्ठाळी व गोव्यातील इतर भागातील पर्यावरणप्रेमी लोक यावेळी उपस्थित होते.
सुनावण्या घेण्याचा प्रयत्न झाल्यास विरोध करू
रेल मार्ग दुपदरीकरणासाठी भू संपादनाला विरोध करताना प्रदेश काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उपजिल्हाधिकारी सचिन देसाई यांची भेट घेऊन स्थानिक लोक भू संपादनाला व रेलमार्ग दुपदरीकरणाला विरोध का करीत आहेत याविषयी सविस्तर माहिती दिली आणि जमीन मालकांच्या होऊ घातलेल्या जनसुनावणी रद्द करण्याची मागणी त्यांनी केली. त्यामुळे उपजिल्हाधिकाऱयांनी सोमवारची सुनावणी तात्पुरत्या काळासाठी रद्द केल्याचे जाहीर केले. मात्र, विरोधकांनी एकच नव्हे तर दि. 27 पर्यंत होणाऱया सुनावण्याही रद्द करण्यात याव्यात अशी मागणी केली. त्यावर तसा निर्णय घेणे आपल्या अधिकारांत नसल्याचे स्पष्ट करून उपजिल्हाधिकाऱयांनी वेळ मागून घेतला. मात्र, त्यानंतर या कार्यकर्त्यांना उपजिल्हाधिकाऱयांचे दर्शनच झाले नाही. त्यामुळे संध्याकाळी साडे वाजेपर्यंत उपजिल्हाधिकाऱयांच्या कार्यालयाबाहेर व कार्यालयामध्ये उपजिल्हाधिकाऱयांची वाट पाहत ठाण मांडून होते. शेवटी साडे सहाच्या सुमारास या कार्यालयातील एका कर्मचाऱयाने उपजिल्हाधिकाऱयांची सुचना कार्यकर्त्यांना कळवली. उपजिल्हाधिकाऱयांनी पुढील निर्णय आपण कळवू अशी सुचना या कर्मचाऱयामार्फत केली होती. परंतु या सुचनेमुळे कार्यकर्त्याचे समाधान झाले नाही. संकल्प आमोणकर यांनी उपजिल्हाधिकाऱयांवर खोटारडेपणाचे आरोप केले. संध्याकाळपपर्यंत सरकारचा निर्णय ऐकण्यासाठी थांबलेल्या लोकांचा उपजिल्हाधिकाऱयांनी मागच्या दरवाजातून पळ काढून विश्वासघात केल्याची टीका त्यांनी केली. भू संपादनासंबंधीत सर्व सुनावण्या रद्द व्हायला हव्यात अशी मागणी करून सुनावणी घेण्याचा प्रयत्न केल्यास त्या घेऊ दिल्या जाणार नाहीत असा ईशाराही त्यांनी संध्याकाळी दिला.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा आमदारांचाही सहभाग
दुपारी तीन वाजल्यापासून संध्याकाळी उशिरापर्यंत रेल्वे दुपदरीकरणाविरोधी निदर्शने झाली. या निदर्शनांमध्ये गोंयचो एकवोट, गोंयचो आवाज, गोयांत कोळसा नाका व इतर सामाजीक संघटनांसह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते. आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, आमदार चर्चिल आलेमाव, राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जुझे फिलिप डिसोजा, नझीर खान, नगरसेवक सैफुल्ला खान व कार्यकर्तेही सहभागी झाले होते. कुठ्ठाळीच्या आमदार एलिना साल्ढाना यांनीही उपस्थिती लावून रेलमार्ग दुपदरीकरणाला आपला विरोध कायम असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले. यापूर्वीही त्यांनी ठिकठिकाणी रेलमार्ग दुपदरीकरण विरोधी प्रदर्शन करून सरकारलाही ठणकावलेले आहे.