गोव्यातील मार्ग दुरुस्ती कामामुळे वाहतूक बंद
प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिल्हाबाहेरील प्रवास बंदी तसेच ई-पासची तरतूद राज्य सरकारने रद्द केली आहे. त्यापाठोपाठ मध्यरेल्वेने राज्यातील वेगवेगळ्या स्थानकावरील रेल्वे गाडय़ांवच्या आरक्षणाला सुरुवात केली आहे. मात्र, गोवा येथे दुरूस्तीचे काम सुरू असल्याने ‘गणपती स्पेशल’ वगळता कोकण रेल्वे मार्गावर सध्या रेल्वे वाहतूक बंदच आहे. त्यामुळे मार्ग पुर्ववत होईपर्यंत तरी या निर्णयाचा फायदा कोकणातील रेल्वे प्रवाशांना मिळू शकत नाही.
कोकण रेल्वे मार्गावर पेडणे ते मडगाव दरम्यान बोगद्याचे काम सुरु आहे. त्यामुळे कोकण रेल्वेमार्गावरील गाडय़ा पर्यायी मार्गाने वळवण्यात आल्या आहेत. हा प्रवास किमान 10 सप्टेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. दरम्यानच्या काळात कोकण रेल्वेमार्गावर पनवेल ते सावंतवाडी रेल्वेगाडय़ा बंद राहणार आहेत. गणपती स्पेशल म्हणून सोडण्यात येणाऱया गाडय़ांना त्यासाठी अपवाद करण्यात आले आहे. या गाडय़ा मुंबई ते सावंतवाडीदरम्यान धावत आहेत. 5 सप्टेंबरला शेवटची स्पेशल धावेल.
कोकण रेल्वे मार्गावर दोष निर्माण होण्यापुर्वी मंगला व नेत्रावती या गाडय़ा धावत होत्या. या गाडय़ातून प्रवास करणाऱयांना राज्यातील स्थानकांचे तिकीट मिळत नव्हते. प्रवासी मडगावचे तिकीट काढून रत्नागिरीत उतरत असतं. . आता 10 सप्टेंबरपर्यंत मार्गाची दुरुस्ती झाल्यास पुन्हा या कोकण रेल्वेमार्गावरुन वळवण्यात येतील. त्यावेळी चिपळूण, रत्नागिरी व सिंधुदुर्गातील स्थानकांवर गाडय़ा थांबू शकतील आणि त्या गाडय़ांचे कोकणातील स्थानकांवरील तिकीटही उपलब्ध होईल.
राज्याने प्रवास बंदी उठवली, मध्यरेल्वेने तिकीटे देण्यास सुरुवात केली, मात्र रेल्वेमार्गावरील दुरुस्तीचे काम चालू असल्याने कोकणातील प्रवाशांना सध्या रेल्वे प्रवासाचा लाभ घेता येत नाही. मुंबई ते सावंतवाडी दरम्यान धावणारी तुतारी एक्स्प्रेस सुरु करण्याचा अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. तथापी राज्याने प्रवास बंदी उठवल्याने लवकरच मध्यरेल्वे त्याचा विचार करेल, अशी शक्यता आहे. ही गाडी सुरु झाल्यास कोकणातील प्रवाशांना रेल्वेची सोय उपलब्ध होईल.