तुंटपुंजा मेहनताना असतानाही त्यांची सेवा वाखाखण्याजोगी
प्रवीण कांबळे / लांजा
जगभरात कोरोना विषाणुने नियमितचा घास हिरावून घेतला आहे. या काळात रेल्वे प्रवासी सेवा बंद असतानाही कोकण रेल्वेचे सहाय्यक (हमाल) हे तुटपुंज्या मेहनतानावर आयुष्य जगत असूनही सध्या पार्सल्स, जीवनावश्यक वस्तूचे चढ-उतार व ने-आण करत आहेत. त्यांचे हे कार्य वाखाखण्याजोगे आहे.
कोरोना संचारबंदीमुळे रेल्वे प्रवासी सेवा 3 मे पर्यंत बंद राहणार अहे. रेल्वेवर अवलंबून असलेल्या रेल्वे सहाय्यक, फिरते विक्रते, मजूर यांचा रोजगार ठप्प पडला आहे. कोकण रेल्वे रत्नागिरी, गोवा, उडपी आदी स्थानकांवर परवाने प्राप्त सहाय्यक हमाल प्रवासी सामान आणि पार्सल माल चढ-उतरणीचे काम करतात. निश्चित दरानुसार हे हमाल गेली अनेक वर्षे रेल्वे सेवा करीत आहेत. कोकण रेल्वेच्या उभारणीपासून आजतागायत ही मंडळी तुटपुंज्या मेहनतानावर काम करतात. माजी रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी केलेल्या घोषणेनुसार कोकण रेल्वेने ही चतुर्थी श्रेणी कर्मचारी भरती प्रक्रियेमध्ये या हमालांना नोकरीची संधी दिली होती. परंतु वयोमान व वैद्यकीय तपासणीमध्ये केवळ 4 जनच नियुक्त झाले होते.
रत्नागिरी स्थानकावर कार्यरत असलेल्या हमाल यांनी कोणताही मुलाहिजा न बाळगता संचारबंदी काळात माल वाहतूक, औषधे, आंबा आदी जीवनावश्यक वस्तूंच्या चढ उतरणीसाठी पुढे आले आहेत. कोकण रेल्वे वरिष्ठ अधिकारी यांनी या सहाय्यकांचे कौतुक केले आहे. हातावर पोट असणाऱया या हमालांना काही अंशी मदत म्हणून वाणिज्य विभागाच्या काही कर्मचारी यांनी हात पुढे केला आहे. ज्येष्ठ बिसलपा, सायबु, धर्मा, आनंद, शंकर, शिरशा, मंगेश तेली, बर्गे, सलीम, चाचा आदी सहाय्यक कोकण रेल्वे विशेष पार्सल व्हॅनमधून येणाऱया मालाची चढ-उतरणी करत आहेत. रेल्वे सेवा हे ब्रीद घेऊन आयुष्यात ते संघर्ष करत आहेत.