जिल्ह्यातील गरजूंनी लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आवाहन
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
जिल्ह्यातील रेशनकार्ड नसणाऱ्या कुटुंबाला मे आणि जून महिन्यासाठी मोफत प्रती व्यक्ती पाच किलो तांदूळ आणि प्रती कुटुंब एक किलो हरभरा देण्यात येणार आहे. याचा गरजूंनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे. 19 जूनपासून धान्याचे वाटप करण्यात येणार आहे.
केंद्र शासनाच्या आत्मनिर्भर भारत वित्तीय सहाय पॅकेजअंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना आणि कोणत्याही योजनेत समाविष्ठ नसलेल्या रेशन कार्डधारकांना याचा लाभ होणार आहे. सोलापूर शहरात 110 केंद्रामार्फत सुमारे 25 हजारांपेक्षा जास्त नागरिकांना तर जिल्ह्यातील 943 केंद्रातील 1 लाख 4169 एवढ्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सोलापूर शहरातील अ,ब,क आणि ड परिमंडळातील रहिवासी भागात तर जिल्ह्यात प्रत्येक गावातील रेशन दुकानात आधारकार्डासह गेल्यानंतर धान्य मिळेल. राज्य शासनाच्या निर्देशानुसार रेशनकार्ड नसणाऱ्या कुटुंबाला तांदुळ आणि हरभरा देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठीचा तांदुळ आणि हरभरा जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. अंदाजे 12 हजार 102 क्विंटल तांदुळ आणि 735 क्विंटल हरभरा वितरण करण्याचे नियोजन केले असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी उत्तम पाटील यांनी सांगितले.