प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊन काळात जिल्हय़ातील एकही नागरिक उपाशी राहू नये, यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. जिल्हय़ातील रास्त भाव धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरू असून 15 एप्रिल 2020 रोजीपर्यंत जिल्हय़ातील 1 लाख 7 हजार 490 प्राधान्य कुटुंब लाभार्थी व 18 हजार 319 अंत्योदय लाभार्थ्यांना 27 हजार 352 क्वींटल अन्नधान्याचे वाटप करण्याचा उच्चांक गाठला असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब गिते यांनी दिली.
तालुका, गोदाम व रास्त भाव दुकानांची संख्या, नियमित व मोफत पोहोचलेले धान्य अनुक्रमे पुढीलप्रमाणे आहे. धान्याचे आकडे मेट्रीक टनमध्ये आहेत. सावंतवाडी – 59, 554.33 मे. टन नियमित, 543.64 मे. टन मोफत, दोडामार्ग – 23, 183.54, 178.66, वेंगुर्ले – 39, 378.68, 342.36, कुडाळ – 78, 660.86, 636, कणकवली – 69, 586.89, 546, मालवण – 33, 260.45, 251.46, आचरा – 32, 192.42, 182.13, देवगड – 36, 239, 240, विजयदुर्ग – 29, 221, 220, वैभववाडी – 34, 192.29, 195.46. एकूण 432 धान्य दुकानांमध्ये 3 हजार 469 पूर्णांक 44 मे. टन नियमित धान्य व 3 हजार 335 पूर्णांक 69 मे. टन मोफत धान्य पोहोचले आहे. या धान्याचे लाभार्थ्यांना वाटप करण्यात येत आहे.
केशरी शिधापत्रिकाधारकांना प्रत्येकी तीन किलो गहू प्रति किलो आठ रुपये दराने व दोन किलो तांदूळ प्रतिकिलो 12 रुपये दराने दोन महिन्यांसाठी वाटप करण्यात येत असल्याचे गिते यांनी सांगितले.