फिर्याद देण्यासाठी व्यावसायिक बैलहोंगल पोलीस स्थानकात : एफआयआरनंतर उलगडा होणार
प्रतिनिधी /बेळगाव
कोल्हापूरहून केरळकडे निघालेले वाहन अडवून मोठय़ा प्रमाणात रोकड लुटण्याच्या घटनेला रविवारी तीन दिवस उलटले तरी रात्रीपर्यंत अद्याप एफआयआर दाखल झाला नव्हता. मोठय़ा प्रमाणात लूट होऊनही एफआयआर दाखल करण्यास टाळाटाळ का केली जात आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पहिल्या दिवसापासून या घटनेची नोंद कोणत्या पोलीस स्थानकात करायची? यासंबंधीचा घोळ सुरू आहे. सुरुवातीला हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात, त्यानंतर बैलहोंगल पोलीस स्थानकात फिर्याद देण्याचा प्रयत्न झाला. हद्दीच्या आधारावर कित्तूर पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यासंबंधीही चर्चा झाली. मात्र, प्रत्यक्षात कोणत्याच पोलीस स्थानकात रविवारी रात्रीपर्यंत एफआयआर दाखल झाला नाही.
पोलीस दलातील वरि÷ अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री बैलहोंगल पोलीस स्थानकात फिर्याद देण्यास सांगण्यात आले होते. मात्र, संबंधितांनी काहीच हालचाल केली नाही. आम्ही चर्चा करून उद्या येतो, असे सांगून रात्री उशिरा तेथून निघाले होते. रविवारी रात्रीपर्यंत फिर्याद देण्यासाठी कोणीच आले नाहीत.
फिर्याददारांची कुणीतरी दिशाभूल करत आहेत का? असा संशय निर्माण झाला आहे. मोठय़ा प्रमाणात रक्कम लुटल्याची घटना घडल्यानंतर लगेच एफआयआर दाखल केला असता तर प्रत्यक्ष तपासाला सुरुवात झाली असती. कोणत्या क्रमांकाच्या अर्टिगातून येऊन रोकड लुटण्यात आली, त्या वाहनाचा क्रमांकही सापडला आहे. त्यामुळे पोलिसांना गुन्हेगारांपर्यंत पोहोचणे सहजशक्मय होणार होते.
प्रत्यक्षात फिर्याद देण्यासच विलंब झाल्यामुळे तीन दिवसांनंतरही या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात झाली नाही. एखाद्या चोरी प्रकरणात दागिने व रोकड लांबविणारा चोरटा सापडला की ज्या सराफांकडे दागिन्यांची विक्री केली आहे, त्यांच्याकडून सोने वसूल करता येते. खर्च केलेले पैसे परत वसूल करण्यास तपास अधिकाऱयांनाही कठीण जाते.
दरम्यान, रविवारी रात्री उशिरा संबंधित व्यावसायिक पुन्हा बैलहोंगल पोलीस स्थानकात पोहोचल्याची माहिती मिळाली असून प्रत्यक्षात एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. वरि÷ पोलीस अधिकारीही या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहात आहेत. एफआयआर दाखल झाल्यानंतरच नेमका प्रकार काय आहे? इतकी मोठी रक्कम कुठून आली? दरोडेखोर कोण? त्यांना माहिती कोणी दिली? आदी प्रश्नांचा उलगडा होणार आहे.