प्रतिनिधी / खानापूर
आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये खानापूर मतदारसंघातून भाजपची उमेदवारी माजी आमदार अरविंद पाटील यांनाच देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केली. त्यांच्या या घोषणेमुळे खानापूर तालुका भाजपात एकच खळबळ माजली आहे.
यामुळेच तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांची तातडीची बैठक शुक्रवारी येथील श्री राम मंदिरात झाली. या बैठकीत लक्ष्मण सवदी यांनी केलेल्या एकतर्फी घोषणेचा तीव्र निषेध करण्यात आला. तसेच अरविंद पाटील यांना पक्षात प्रवेश देवू नये, असा ठराव देखील संमत करुन तो राज्य भाजपचे अध्यक्ष नवीनकुमार कटील, राज्य प्रभारी अरुणकुमार तसेच भाजपच्या इतर वरिष्ठ नेत्यांना पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी तालुका भाजपचे अध्यक्ष संजय कुबल होते. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.
खानापूर तालुक्याच्या राजकारणाशी लक्ष्मण सवदी यांचा संबंध काय, खानापूर तालुक्याचा उमेदवार ठरवण्याचा त्यांना कुणी अधिकार दिला. त्यांनी आपले मंत्रिपद सांभाळावे, आमच्या तालुक्यातील राजकारणात हस्तक्षेप करु नये, असा स्पष्ट इशारा यावेळी त्यांना देण्यात आला. तसेच अरविंद पाटील यांना भाजपात घेतल्यास तालुक्यातील एकनिष्ठ कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय होईल. तसेच लक्ष्मण सवदींनी तालुक्यातील पक्ष कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता, काही तरी बेजबाबदार वक्तव्य करण्याचा प्रयत्न केल्यास त्याचा विपरित परिणाम तालुक्यातील आगामी ता. पं. व जि. पं. निवडणुकीवर होण्याचा धोका आहे. यामुळे पक्षश्रेष्ठीनी वेळीच सवदी यांना ताकीद करावी, अशी मागणी करण्यात आली. पक्षश्रेष्ठी भावना ओळखून योग्य निर्णय घेतील, अशी आशा देखील अनेक कार्यकर्त्यांनी या बैठकीत व्यक्त केली.
यावेळी प्रमोद कोचेरी, संजय कुबल, बाबुराव देसाई, धनश्री सरदेसाई, विजय कामत, बाळाराम सावंत, जयंत तिनेकर, रवि बनोशी, माजी तालुका अध्यक्ष विठ्ठल पाटील, यशवंत कोडोळी, हणमंत पाटील, प्रकाश तिरवीर, सुरेश देसाई व इतर अनेक कार्यकर्त्यांनी आपले विचार व्यक्त करुन अरविंद पाटील यांना पक्षात घेण्यास तीव्र विरोध केला. त्यांना विरोध असतानाही जर उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना प्रवेश दिल्यास प्रसंगी सर्व पदाधिकारी व मोर्चाचे पदाधिकारी राजीनामा देतील, असा इशाराही देण्यात आला.