नवी दिल्ली / ऑनलाईन टीम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना महात्मा फुले जयंतीपासून ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीपर्यंत देशात लसीकरण उत्सव साजरा करण्याचं आवाहन केलं आहे. यानिमित्तान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक पत्र लिहिले आहे. हे पत्र पंतप्रधान कार्यालयानं ट्विट केलं आहे.
नरेंद्र मोदी यांनी लसीकरण उत्सव हे कोरोनाविरुद्धच्या दुसऱ्या युद्धाची सुरुवात असल्याचं म्हटलं आहे. यामध्ये आपल्याला वैयक्तिक आणि सामाजिक स्वच्छतेवर भर देण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच Each One- Vaccinate One याअंतर्गत ज्येष्ठ नागरिक आणि ज्यांचं शिक्षण झालेलं नाही त्यांची मदत करा, असं आवाहन देखील त्यांनी केले आहे.
कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तींना उपचारांसाठी मदत करा. कोरोना विरुद्धच्या लढ्यात ज्यांच्याकडे साधन उपलब्ध नाहीत, त्यांना साधनं उपलब्ध करुन द्या. मास्क वापरुन स्वत:चं आणि इतरांचं संरक्षण करा . यासोबतच एखाद्या व्यक्तीला कोरोना संसर्ग झाल्यास जनतेने सूक्ष्म कंटेनमेंट झोन लागू करण्यामध्ये पुढाकार घ्यावा. जिथे एखादा व्यक्ती कोरोनाबाधित आढळेल, तिथे मायक्रो कंटेनमेंट झोन बनवण्यात यावा, असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी केलं.
पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना आणि लसीकरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लसीचा एकही डोस वाया जाऊ देऊ नका, असं आवाहन केलं आहे. आपल्याला झिरो वॅक्सिन वेस्टेजपर्यंत पोहोचायचं आहे, असं मोदी म्हणाले. ज्यांना लसीची आवश्यकता आहे त्यांना लस दिली जावी, असंही ते म्हणाले.
देशातील नागरिकांनी ज्यावेळी काम असेल त्यावेळी घराबाहेर पडावे, असं आवाहन केलं आहे. ज्यावेळी गरज नसेल त्यावेळी नागरिकांनी घराबाहेर पडू नका, असं नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना सांगितलं आहे.तसेच येत्या चार दिवसांमध्ये आपण वैयक्तिक पातळीवर, सामाजिक आणि प्रशासकीय स्तरावर कोरोना रोखण्यासाठी स्वत: ध्येय निश्चित करु आणि पुन्हा एकदा कोरोना विषाणू संसर्ग नियंत्रित करण्यामध्ये यशस्वी होऊ, असं नरेंद्र मोदी म्हणाले.