पटना-दिल्लीसह 17 ठिकाणी धाडी, रेल्वेत नोकरी मिळवणाऱयांच्या घरांवर कारवाई
नवी दिल्ली , पाटणा / वृत्तसंस्था
बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राजदचे नेते लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबियांच्या 17 ठिकाणांवर शुक्रवारी सीबीआयने छापे टाकले. रेल्वेभरती मंडळात घोटाळाप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. लालूप्रसाद यादव, त्यांची पत्नी राबडीदेवी आणि मुलगी मिसा भारती यांच्या पाटणा, गोपालगंज आणि दिल्लीतील ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. सीबीआयने गोपालगंज आणि दिल्लीत कारवाई पूर्ण केली आहे. याचदरम्यान रेल्वेत नोकरी मिळवलेल्या लोकांच्या घरांवरही छापे टाकण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
सीबीआय अधिकाऱयांनी छाप्यादरम्यान राबडीदेवी आणि मोठा मुलगा तेजप्रताप यादव यांची पाटणा येथील निवासस्थानी वेगवेगळय़ा खोल्यांमध्ये चौकशी केली. चौकशीसाठी 3-3 अधिकाऱयांची दोन पथके नेमण्यात आली होती. राबडीदेवी यांची चौकशी करण्यासाठी एक महिला आयपीएस अधिकारीही पाटण्यात दाखल झाली होती. याचदरम्यान मिसा भारती यांच्या दिल्लीतील निवासस्थानी लालू यादव यांचीही चौकशी करण्यात काही अधिकारी गुंतले होते. छापे पडल्याची कुणकुण लागताच ‘माझी तब्येत ठीक नाही, तुम्ही आधी डॉक्टरांना बोलवा,’ असे लालूप्रसाद यादव यांनी सीबीआय अधिकाऱयांना सांगितले. यासोबतच दोन वकिलांनाही पाचारण करण्यात आले होते.
राजद कार्यकर्त्यांची निदर्शने
सीबीआयच्या कारवाईविरोधात पाटणा येथे राष्ट्रीय जनता दलाच्या (आरजेडी) कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. राजद कार्यकर्त्यांनी या छाप्याला राजकीय हेतू असल्याचे संबोधत आंदोलन सुरू केले होते. छाप्यांची माहिती मिळताच राबडीदेवींच्या निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. कार्यकर्ते केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देत होते. हा सत्तेचा दुरुपयोग असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
‘नोकरीच्या बदल्यात जमीन’ फॉर्म्युला
रेल्वेभरती बोर्ड घोटाळय़ाशी संबंधित हे छापे टाकण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. 2004 ते 2009 दरम्यान लालू रेल्वेमंत्री असताना नोकरी देण्याच्या बदल्यात जमीन आणि भूखंड घेतल्याचा आरोप आहे. याच प्रकरणी तपासानंतर सीबीआयने लालू आणि त्यांच्या मुलीवर नवा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, लालूंच्या रेल्वेमंत्री असतानाच्या काळात भ्रष्टाचाराची नवी पद्धत अवलंबली गेली. लोकांना रेल्वेच्या ‘ड’ वर्गाच्या नोकऱया देण्याच्या बदल्यात त्यांच्याकडून पैशांऐवजी जमीन घेण्यात आल्याचा दावा बिहारचे भाजप खासदार आणि माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी केला होता.