ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
‘लावा’ ही मोबाईल कंपनी आपला चीनमधील व्यवसाय भारतात हलविणार आहे. पुढील 5 वर्षात ही कंपनी भारतात 800 कोटींची गुंतवणूक करणार असल्याची माहिती लावा इंटरनॅशनलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक हरी ओम राय यांनी दिली.
‘लावा’ने आपला चीनमधील व्यवसाय गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे. लावा चीनमधून आपला व्यवसाय भारतात आणणार आहे. मोबाईल फोन डेव्हलपमेंट आणि उत्पादन वाढीसाठी पुढील पाच वर्षात भारतात 800 कोटी रूपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय ‘लावा’ने घेतला आहे. लॉकडाऊन दरम्यान चीनमधील निर्यात लावाने पूर्ण केली आहे. यापुढे लावा मोबाईलचे उत्पादन आणि विक्री भारतातूनच केली जाईल. यापूर्वी चीनमधून या मोबाईलची जगभर विक्री केली जात होती.
दरम्यान, मागील चार वर्षांत देशात मोबाईल फोनचे उत्पादन आठ पटींनी वाढले आहे. 2014–15 मध्ये 18,900 कोटी रुपयांवरून वाढून ते 2020-2 मध्ये ते 2 लाख कोटींहून अधिक झाले आहे. देशांतर्गत उत्पादनाद्वारे देशाची मागणी जवळजवळ पूर्ण झाली आहे. पीएलआय योजनेच्या माध्यमातून मोबाईल फोनसाठी देशांतर्गत किंमती 2025 पर्यंतच्या 20-25 टक्क्यांवरून 35-40 टक्क्यांपर्यंत वाढतील आणि 8 लाख रोजगार निर्माण होतील, असा सरकारचा अंदाज आहे.