अचूक बातमी “तरुण भारत”चीशुक्रवार, 16 जुलै 21( स्पेशल )
● जनतेच्या माथी मारून प्रशासन खुशाल ● आज पालकमंत्र्यांची बैठक ● नीट जगू द्या, हीच मागणी
विशेष प्रतिनिधी / सातारा :
कोरोनाची दुसरी लाट साऱ्या देशात उतरली, साऱ्या महाराष्ट्रात उतरली पण, साताऱ्यात मात्र तिची कळा काही जाईना. आकडा 800 ते 1,000 च्या घरात खेळत राहिल्याने जिल्हावासीयांचे जगणे मुश्किल झालंय. दरम्यान, आठवड्याचा अहवाल घेऊन शुक्रवारी लॉकडाऊनचा निर्णय होणार असल्याने ‘आम्हाला नीट जगू द्या’ इतक्याशा मागणीसाठी आक्रोश होऊ लागलाय. महामारीची भीती सामान्य माणसालाही आहेच मात्र रोगापेक्षा इलाज भयानक अशी सातारा जिल्हय़ाची स्थिती झालीय त्यामुळे नव्याने लावला तर तो लॉकडाऊन कोरोनाचा आहे का आकड्यांचा आहे, हेही प्रशासनाने स्पष्ट करावे, अशी मागणी आहे. ज्याआधारे पॉझिटिव्हीटी रेट ठरवला जातो तो पॉझिटिव्हीटी रेट गेल्या चार दिवसांपासून जाहिर करणे बंद झाल्याने माध्यमांच्याही नजरा उंचावल्या आहेत. तसेच टेस्टींग रेट शंकास्पदरित्या पुन्हा 16 हजारांच्या घरांत गेल्याने शनिवारपासून आहे तोच लॉकडाऊन राहणार की त्यात काही सूट मिळणार याकडे साऱ्यांच्या नजरा असून ‘हटवा तो लॉकडाऊन’ सारे ठाम आहेत.
प्रशासनाकडून पॉझिटिव्हीटीचा आकडा देणे बंद
शासनाने लॉकडाऊनसाठी जिल्हय़ांचे पाच स्तर केले आहेत. हे स्तर त्या-त्या जिल्हय़ांच्या पॉझिटिव्हीटी रेट वर अवलंबून राहण्याचे धोरण आहे. सातत्याच्या लॉकडाऊनमुळे सातारकर त्या रेटवर सातत्याने लक्ष ठेऊन असत. दर शुक्रवारी त्यावर निर्णय घेतला जातो. मात्र गेल्या चार दिवसांपासून बाधित, मृत्यू, मुक्त असे आकडे नेहमीप्रमाणे जाहिर केले जात असले तरी एकुण चाचण्या, त्यात रॅट किती-आरटीपीसीआर किती व त्यांचा पॉझिटिव्हीटी दर काय हे मात्र जाहिर केले जात नाही. हे आकडे दैनंदिन व्हॉटसऍपवर जाहिर होत असत.
टेस्टींग 16 हजारांच्या घरात गेल्याने अपलोड घोटाळ्याची शंका
मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात दुसरी लाट ऐन बहरांत होती. मात्र जिल्ह्यात टेस्टींगचे आकडे क्षमतेपेक्षा कमी असल्याचे ‘तरुण भारत’ने प्रशासनाला दाखवून दिले तर पुढील 15 दिवसांत हे आकडे क्षमतेपेक्षा प्रचंड जास्त म्हणजे 16 हजारांच्या घरात गेल्याचेही दाखवून दिले. काय तरी गडबड असल्याचे मान्य करूनही 31 मे रोजी लॉकडाऊनचा निर्णय घेतल्याने 1 जूनच्या अंकात ‘तरुण भारत’ला जिल्हय़ातला ‘अपलोड घोटाळा’ जनतेपुढे आणावा लागला. आता त्यामानाने लाट ओसरली असताना गुरूवार 15 जुलैला टेस्टिंगचा आकडा पुन्हा 15,181 म्हणजेच 16 हजारांच्या घरांत पोहोचले असल्याने पुन्हा अपलोड करण्यांत दिरंगाई होत नाही ना, याची शंका लोकांकडून व्यक्त होत आहे. गंमत म्हणजे, रोजच्या रोज आकडे अपलोड होत आहेत का? हे पाहण्यासाठी सक्षम यंत्रणा अद्याप कार्यान्वित नाही.
पुरावा : एक तो घोडा बोलो या एक तो चतुर बोलो; रिपोर्टचा घोळ
कोरोना टेस्टिंगमध्ये होत असलेले अनेक घोळ ‘तरुण भारत’ने वैज्ञानिकदृष्टय़ा मांडलेले आहेत. रॅट- आरटीपीसीआर यांची फॉल्स निगेटिव्ह लक्षात घेऊन! त्यातूनच एक वैतागलेला रिपोर्ट समोर आला. पाचगणीतल्या नितीन पांडुरंग शिंदे यांच्या कुटुंबात चौघांची रॅट तपासणी केली. सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले. मात्र नितीन यांनी लगेच आरटीपीसीआर केली. दोन दिवसांनी म्हणजे 7 जुलैला त्यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह असल्याचा मेसेज आला. घाबरुन ते आयसोलेट राहिले. मात्र तीन दिवसांनी म्हणजे 10 जुलैला पहाटे जागे असताना त्यांना लिंक आली. त्यावर क्लिक केल्यावर ते निगेटिव्ह असल्याच रिपोर्ट आला. रॅट निगेटिव्ह ठिक आहे. मात्र आरटीपीसीआर एकदा पॉझिटिव्ह आणि दुसऱयांदा निगेटिव्ह आणि दोन्हीचे आयसीएमआर नंबर वेगवेगळे यामुळे सारं कुटुंब गोंधळात होते. निगेटिव्ह-पॉझिटिव्ह-निगेटिव्ह या क्रमामुळे पडोसनमधल्या मेहबूब सारखी त्यांची अवस्था झाली. एक तो घोडा बोलो या एक एक तो चतुर बोलो, प्रशासनाने अशा घटनांकडे तरी गांभिर्याने पहायला हवे ना?
पुरावा : स्वॅब दिलाच नाही तरी रिपोर्ट आलाय
टेस्ट केल्यानंतर येणाऱ्या रिपोर्टमध्ये मतमतांतरे असू शकतात. ‘तरुण भारत’ने वैज्ञानिकदृष्टय़ा पुरावे दिले आहेतच. या साऱयावर आणखी एक खणखणीत पुरावा म्हणजे निमसोड (ता. खटाव) येथील अमोल मोरे बायकोसोबत शेतकामात रममाण होते. तितक्यात अमोल यांचा मोबाईल खणाणला. बघतायत काय त्यांची बायको हर्षाली अमोल मोरे या निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट त्यांना मिळाला. बोंबलायला, जिणं कधी टेस्टच केली नाही ती पॉझिटीव्ह जाऊदे निगेटिव्ह तरी कशी..! याने शेतकाम सोडून दोघे घरपोच झाले. स्वॅब न दिलेल्या मात्र निगेटिव्ह आलेल्या टेस्टचा आयसीएमआर नंबर आहे 337873236
मार्च, एप्रिल, मे, जून आणि जुलै ब्रेक द चेन अंतर्गंत जिल्हय़ात कधी कडक, कधी थोडा असा लॉकडाऊनचा खेळ सुरु आहे. त्यातच दैनंदिन आकडेवारीचा आलेख खालीवर होत असला तरी तो तीन अंकी संख्येवर स्थिर आहे. दुसरीकडे मुंबई व पुण्यासारख्या मोठय़ा शहरातील कोरोना संसर्ग आटोक्यात आला असताना सातारा जिल्हय़ात नेमके काय सुरु आहे, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. सातत्याने लॉकडाऊनमुळे सामाजिक, आर्थिक स्थितीचा बोजवारा उडतोय. अनेकविध समस्यांना सर्वजण तोंड देत आहेत.
सातारा जिल्हय़ात तर लॉकडाऊन केला तरी संसर्ग वाढ सुरुच असते आणि लॉकडाऊन शिथील केलेला असला तरी बाधित वाढीचा रतीब सुरुच असतो. मृत्यूदर थोडा घटला आहे पण थांबलेला नाही. या सर्व स्थितीत प्रशासनाकडून झालेल्या कोरोना अपलोड घोटाळय़ामुळे समोर आलेल्या आकडेवारीमुळे लॉकडाऊन अक्षरशः लादला गेला होता. याबाबत ‘तरुण भारत’ने वस्तुस्थिती समोर आणल्यामुळे मग कडक लॉकडाऊनमधून एक आठवडा तरी सातारा जिल्हावासियांची सुटका झाली होती.
पुन्हा मग नव्याने आरटीपीसीआर टेस्टच्या टक्केवारीवर
जिल्हादंडाधिकाऱयांनी लॉकडाऊनमध्ये बदल केला. फक्त अत्यावश्यक सेवा सुरु व बाकीची दुकाने बंद असा प्रकार सुरु केल्याने याबाबत जिल्हावासियांमध्ये प्रचंड नाराजी पसरलली आहे. त्याचाच परिणाम म्हणून कराड, साताऱयासह सर्वच तालुक्यातील व्यापारी, सामाजिक संस्थांनी सविनय कायदेभंग करत साखळी आंदोलने केली. व्यापाऱयांसह सामाजिक कार्यकर्त्यांनीही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना निवेदने देवून लॉकडाऊनला विरोध दर्शवलेला आहे.
आज होणार प्रशासनाची बैठक
कोरोना संसर्गाचा वेग जिल्ह्यात कमी होऊ लागला आहे. दुसरीकडे नागरिकांसह व्यापाऱ्यांचा लॉकडाउनला विरोध आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (ता. 16) लॉकडाऊनबाबत निर्णय घेण्यासाठी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांसह इतर अधिकाऱ्यांशी चर्चा करून ते निर्णय घेणार आहेत. राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या जिह्यात सांगली, सातारा व कोल्हापूरचा समावेश असून, येथील लॉकडाऊन कायम ठेवण्याचा निर्णय झाला आहे, पण साताऱयात कमी होत असलेली कोरोना बाधितांची संख्या लक्षात घेता पालकमंत्री काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
साताऱ्यातील पॉझिटिव्हटी रेट कमी त्यामुळे मध्यंतरी कराड, साताऱ्यातील लोकांनी लॉकडाउनवरून प्रशासनाविरोधात रस्त्यावर उतरुन लॉकडाऊनला विरोध केला होता.
– दीपक प्रभावळकर 9235403232, 9527403232