समस्त भारतीय समाजाला स्वायत्ततेचा आणि स्वयंनिर्णयाचा ‘संतोष’ अनुभवता यावा म्हणून प्रथम भारतात ब्रिटिश सत्तेविरोधात ‘असंतोष’ निर्माण करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज 165 वी जयंती आहे. त्यांचा जन्म 23 जुलै 1856 चा आहे. यानिमित्त लोकमान्यांनी परकीय सत्ताधीशांविरोधात केलेला अविश्रांत संघर्ष, त्यांचा असीम त्याग, दुर्दम्य आत्मविश्वास, तसेच लोकोत्तर संघटनाशक्ती यांचे स्मरण आज प्रत्येकाने करणे आवश्यक ठरते. त्यांची दूरदृष्टी आजही मार्गदर्शक ठरत आहे.
भारतीयांना आपल्या भूमीत सन्मानाने जीवन जगता यावे, यासाठी त्यांनी स्वराज्याची मागणी केली होती. याच मागणीचे नंतर ‘संपूर्ण स्वातंत्र्या’च्या मागणीत रुपांतर झाले आणि अंतिमतः ब्रिटिश सत्तेला भारतातून काढता पाय घ्यावा लागला होता. अशा प्रकारे लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्र्याचा मूळ प्रेरणास्रोत होते. यामुळेच भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीचे जनकत्व त्यांच्याकडे जाते.
चैतन्य जागविले
शेकडो वर्षांच्या परकीय सत्तेत जीव मुठीत धरून राहण्याची वेळ आल्याने आत्मविश्वास आणि आत्मसन्मान गमावून बसलेल्या भारतीय समाजात चैतन्याचे स्फुल्लिंग चेतविणे हे कार्य सोपे नव्हते. त्यासाठी लोकांचे प्रबोधन करून प्रचंड संघटना उभी करण्याची आवश्यकता होती. प्रबोधनासाठी ‘केसरी’ हे वृत्तपत्र सुरू केले. कारण वृत्तपत्र हे एकाच वेळी लक्षावधी लोकांपर्यंत पोहचण्याचे त्या काळातील एकमेव माध्यम होते. त्या माध्यमाचा त्यांनी आणि त्यांच्याइतक्याच त्यागी सहकाऱयांनी प्रभावी उपयोग करून ब्रिटिश सत्तेविरोधात जनमानसात असंतोष निर्माण केला. ब्रिटिशांचे अन्याय निर्भिड आणि निर्भयपणे लोकांसमोर मांडले. लोकांनी सातत्याने एकत्र यावे, विचारांचे आदान-प्रदान करावे, एकत्रित कृती करावी यासाठी त्यांनी प्रत्येक महाराष्ट्री माणसाचे सदासर्वकाळ आदरस्थान असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सार्वजनिकरीत्या मोठय़ा प्रमाणात करण्याच्या प्रथेचा प्रारंभ केला. त्याचबरोबर लोकांच्या मनातील धर्मासंबंधीची आणि देवासंबंधीची आस्था व विश्वास लक्षात घेऊन सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याच्या प्रथेचाही प्रारंभ केला.
धर्म आणि पराक्रमाची सांगड
अशाप्रकारे धर्म आणि पराक्रम यांची गणपती आणि शिवाजी महाराज ही श्रद्धास्थाने त्यांनी लोकसंघटनेसाठी अतिशय प्रभावीपणे उपयोगात आणली. त्यांच्या या कृतीमुळे हादरलेल्या ब्रिटिश सरकारने त्यांच्यावर देशद्रोहाचा अभियोग चालवून त्यांना काळय़ा पाण्याची शिक्षा दिली आणि ब्रम्हदेशच्या (सध्याचा म्यानमार) मंडालेच्या कारागृहात पाठवणी केली. ही शिक्षा त्यावेळी मृत्यूघंटाच मानली जात होती. तथापि, लोकमान्यांनी ती हसत हसत स्वीकारून अपराजित धैर्याचा एक वस्तुपाठच लोकांसमोर ठेवला.
आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या जीवनातील काही ठळक आणि निर्णायक प्रसंगांची आठवण करणे आणि त्यापासून प्रेरणा घेणे प्रत्येकासाठी केवळ आवश्यक नव्हे, तर अनिवार्य आहे. आज आपण कोरोनासारख्या अदृष्य शत्रूशी झुंजत आहोत. हा संघर्ष यशस्वी करण्यासाठी आपल्याला लोकमान्यांची जीवनगाथा उपयोगी पडू शकते. कोरोनाशी संघर्ष स्वराज्य मिळविण्यासाठी केलेल्या संघर्षापेक्षा भिन्न असला तरी त्यात विजयी होण्यासाठीची मनोभूमिका समान आहे. म्हणूनच लोकमान्य आजच्या आव्हानात्मक काळातही अनुकरणीय, आदरणीय आणि आदर्श ठरतात.
स्वातंत्र्याबद्दल टिळकांची भूमिका
लोकमान्य टिळक खऱया अर्थाने असंतोषाचे जनक होते. त्यांनी इंग्रजांविरुद्ध भारतीयांच्या मनात असंतोषाची ठिणगी प्रज्वलित केली. त्यामुळे खऱया अर्थाने स्वातंत्र्याचे उद्गाते असेच त्यांना म्हणावे लागेल. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!’ ही त्यांची सिंहगर्जना भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याबद्दल स्फुल्लिंग पेटवणारी ठरली. टिळक आणि आगरकर यांच्यातील वाद सर्वश्रुत आहेत. आगरकरांना प्रथम समाज सुधारणा अभिप्रेत होती, तर टिळकांना आधी स्वातंत्र्य अभिप्रेत होते.
अर्थात टिळकांच्या हयातीत स्वातंत्र्य मिळू शकले नाही, परंतु त्यांच्या मृत्यूनंतर 27 वर्षांनी भारत स्वतंत्र झाला. केवळ स्वातंत्र्य मिळण्यापुरता यांचा संघर्ष मर्यादित राहिला नाही तर त्यांनी गणेशोत्सव आणि शिवजयंती सुरू केली. या उत्सवांच्या माध्यमातून लाखो कार्यकर्त्यांना आणि प्रामुख्याने हिंदूंना एकवटण्याचे काम लोकमान्य टिळकांनी केले. एकीकडे जनतेच्या मनात स्वातंत्र्याबद्दलचे स्फुल्लिंग चेतवायचे आणि त्याचवेळी उत्सवाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना व हिंदूंना एकवटायचे अशी दुहेरी कामगिरी लोकमान्य टिळकांनी केली. खऱया अर्थाने ते दूरदृष्टीचे नेते होते. त्यांच्या स्मृतीला कोटी कोटी प्रणाम!!!