प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई सात उद्योगांना ‘कारणे दाखवा’
प्रतिनिधी/ चिपळूण
लोटे औद्योगिक वसाहतीतील प्रदूषणाच्या तक्रारी वाढत चालल्या असल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या येथील उपप्रादेशिक कार्यालयाने 33 उद्योगांना नोटीस बजावल्या आहेत. यातील सात उद्योगांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली असून एक कारखाना बंद करण्याची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. यासंदर्भातील प्रस्ताव मंडळाच्या कोल्हापूर येथील प्रादेशिक अधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात आला असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

पावसाळय़ात दाभोळखाडीत मासे मरण्याच्या घटना वारंवार घडल्यानंतर संघर्ष समितीकडून तक्रारी करण्यात आल्या. मात्र या तक्रारींचा फारसा उपयोग झालेला नाही. त्यातच खुद्द लोटे वसाहतीमधूनच वाहणाऱया नाल्यांमध्ये बेधडकपणे उद्योगांचे सांडपाणी सोडले जाण्याचे प्रकारही अलिकडच्या काळात वाढू लागले आहेत. सांडपाणी नाल्यात सोडल्यानंतर ते पावसाच्या पाण्याबरोबर वाहून जलस्त्रोत प्रदूषित होत असल्याचा आरोप केला जात आहे. मध्यंतरी शिवालिक कंपनीजवळ संघर्ष समिती, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि खेडमधून आलेल्या महसूलच्या भरारी पथकांच्या उपस्थितीत सदरचा प्रकार उघडीस आल्यानंतर पंचनामा करण्यात आला. दरम्यान, प्रदूषणच्या वाढत्या समस्येच्या पार्श्वभूमीवर प्रदूषण नियंत्रण मंडळाने आपली कारवाई सुरू केली आहे.
वसाहतीतील 33 उद्योगांना प्रदूषणाबाबत खबरदारी घेण्याच्यादृष्टीने स्पष्टपणे ताकीद देणारी नोटीस बजावली आहे. यामध्ये प्रदूषण झाल्याचे यापुढे स्पष्ट झाल्यास थेट कारवाई करण्याचा इशारा सदर उद्योगाला नोटीसीद्वारे देण्यात आला आहे. त्याचबरोबर वसाहतीत नेहमी प्रदूषणाच्या तक्रारीत पुढे असलेल्या सहा उद्योगांना प्रस्तावित आदेश बजावण्याच्यादृष्टीने कारवाईचा प्रस्ताव कोल्हापूर विभागीय कार्यालयाकडे पाठवण्यात आलेला आहे. एका उद्योगाबाबत तक्रारी अधिक असल्याने त्यावर बंदची कारवाई करण्याबाबतचाही प्रस्ताव वरीष्ठस्तरावर कार्यवाहीसाठी गेलेला आहे.
निव्वळ नोटीसा कशासाठी?
प्रदूषण नियंत्रण मंडळ उद्योगांना नोटीस देते. मात्र पुढे म्हणावी तशी अपेक्षित कारवाई होताना दिसत नाही. यापूर्वीही मुंबईतून आलेल्या पथकांमार्फत उद्योगांची तपासणी करण्यात आली. नोटीस धाडून बंदची कारवाईही झाली. मात्र पुढे हेच उद्योग पुन्हा लगेचच सुरू झाले. त्यामुळे मंडळाच्या नोटीस नेमक्या कशासाठी असतात असा प्रश्न निर्माण होताना दिसतो.
