मनसेचे जि. प. समोर उपोषण : पश्चिम महाराष्ट्रातील एका मंत्र्यांचा दबाव असल्याचा आरोप
प्रतिनिधी / ओरोस:
वारसा हक्क कायद्यानुसार नियुक्त्या देताना लाड-पागे समितीच्या शिफारशी डावलून वारसांच्या जागेवर परजिल्हय़ातील अन्य उमेदवारांच्या नियुक्त्या तात्काळ रद्द कराव्यात, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेत बुधवारी जि. प. भवनासमोर उपोषण आंदोलन छेडले. पश्चिम महाराष्ट्रातील एका मंत्र्यांच्या दबावामुळे संबंधितांवर कारवाई केली जात नसल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. मात्र, संबंधितांवर योग्य ती कारवाई झाल्याशिवाय मनसे गप्प बसणार नसल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार वारसाहक्क नियुक्ती देताना जि. प. ने चुकीची कार्यवाही करीत भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप मनसेने केला आहे. सफाई कामगाराच्या निवृत्तीनंतर त्यांच्या जागेवर त्यांच्या वारसांना नियुक्त्या न देता नांदेड, कोल्हापूर तसेच अन्य जिल्हय़ातील भलत्याच उमेदवारांना आर्थिक व्यवहारातून नियुक्त्या देण्यात आल्या. याबाबत मनसेने वर्षभरापूर्वीच आवाज उठवला होता. त्यानंतर आयुक्तांच्या आदेशाने करण्यात आलेल्या कारवाईत याच अधिकाऱयांना निलंबित करण्यात आले. मात्र, चुकीच्या पद्धतीने देण्यात आलेल्या संबंधीत उमेदवारांच्या नियुक्त्याच रद्दबातल ठरवाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
सरकारी काम सहा महिने थांब, टेबलाखालून खाणाऱयांची वाढतेय रांग, अशी बॅनरबाजी करत जि. प. लोकप्रतिनिधी गप्प का? असा सवालही उपस्थित केला आहे. दरम्यान, मुसळधार पाऊस आणि जि. प. ची सर्वसाधारणसभा यामुळे हे आंदोलन लक्षवेधी ठरले. तर दुपारी जि. प. अध्यक्ष सौ. संजना सावंत यांनी शिष्टमंडळाशी चर्चा केली.
याबाबत जि. प. प्रशासनामार्फत चौकशी सुरू असून कोणाच्याही दाबावाला बळी न पडता दोषी आढळणाऱयांवर निश्चितच कारवाई केली जाईल, अशी ग्वाही अध्यक्ष संजना सावंत यांनी दिली. त्यामुळे हे आंदोलन स्थगित करण्यात आले असल्याची माहिती मनसे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी दिली.
यावेळी विनोद सांडव, बाबल गावडे, दीपक गावडे, अविनाश अणावकर, सचिन ठाकुर, सुंदर गावडे, गुरू मर्गज, सर्वेश राणे, गजानन राऊळ, निखिल गावडे, राजेश टंगसाळी, अनिल कसालकर, वैभव धुरी या मनसे पदाधिकाऱयांनी पाठिंबा दर्शवला. तसेच रावजी यादव, अमोल जंगले यांनीही याला समर्थन दिले. timestamp