प्रतिनिधी/ चिपळूण
वाशिष्ठी नदीतील सर्व गाळ काढला जाईल. त्यासाठी लागतील तेवढे पैसे दिले जातील. जोपर्यंत हा संपूर्ण गाळ काढला जात नाही तोपर्यंत पूररेषेची अंमलबजावणी केली जाणार नाही, असा शब्द उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रविवारी उपोषणकर्त्यांच्या भेटीदरम्यान दिला.
गाळ काढा, लाल व निळी पूररेषा रद्द करा, या मागणीसाठी चिपळूण बचाव समितीने 6 डिसेंबरपासून प्रांत कार्यालयाजवळ साखळी उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींही भेटी देऊन विविध आश्वासने देऊन जात आहेत. यात सत्ताधाऱयांसह विरोधी पक्षाच्या नेत्यांचा समावेश आहे. असे असताना रविवारी सामंत यांनीही भेट दिली.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, आमदार शेखर निकम व तुमच्या मागणीनुसार मी येथे आलो आहे. येण्यापूर्वी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून बोललो आहे. तेही चिपळूणला पूरमुक्त करण्यासाठी जेवढे लागेल तेवढे सहकार्य करण्यास तयार आहेत. त्यामुळे तुम्हांला चिंता करण्याची गरज नाही. आसामप्रमाणे येथे एक मजला सोडून दुकाने उभारणे शक्य नाही. पुनर्वसनही करणे तितके सोपे नाही. त्यामुळे गाळ काढणे हा एकमेव पर्याय आहे आणि तो काढण्याची तयारी सरकारची आहे. मी अधिकाऱयांकडून किती बेटे आहेत, किती गाळ काढावा लागणार आहे, याची माहिती घेतली आहे. त्यामुळे वाशिष्ठीतील सर्व गाळ काढण्यासाठी लागणारे पैसे दिले जातील, ते कमी पडणार नाहीत. तसेच जोपर्यंत गाळ काढला जात नाही तोपर्यंत पूररेषेची अंमलबजवणी होणार नाही, इतकाच शब्द देत असल्याचे सामंत यांनी सांगितले.
यावेळी आमदार शेखर निकम, शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रताप शिंदे, संदीप सावंत, शहरप्रमुख उमेश सकपाळ, आरोग्य सभापती शशिकांत मोदी, नगरसेवक मनोज शिंदे, क्षेत्रप्रमुख बाळा कदम, उमेश काटकर, अरूण भोजने, उदय ओतारी, सतीश कदम, किशोर रेडीज, भरत गांगण, राजेश वाजे, राजू देवळेकर उपस्थित होते.
चौकट
1 हजार कोटी म्हणजे 1 वर किती शून्य?
यावेळी बोलताना सामंत यांनी मी 1 हजार कोटी देईन, असे आश्वासन देणार नाही. कारण 1 हजार कोटी म्हणजे एकावर किती शून्य हे मलाही माहिती नाही, असे सांगत भाजपचे प्रदेश चिटणीस, माजी आमदार प्रमोद जठार यांच्यासह अन्य मागणीकर्त्यांना त्यांनी टोला हाणला. काहीही आश्वासने देणार नाही. मात्र जो शब्द देईन तो पाळला जाईल. कारण मुंबईतून रत्नागिरीत जाताना मला येथूनच जायचे आहे, असे बोलताच उपोषणस्थळी हशा पिकला.
आजच्या बैठकीवर उपोषणाचे भवितव्य
13 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी यासंदर्भात मुंबईत बैठक बोलावली आहे. या बैठकीला महसूलचे वरिष्ठ अधिकारी, चिपळूण बचाव समिती व काँग्रेसच्या काही पदाधिकाऱयांना निमंत्रित करण्यात आले आहे, तर जिल्हाधिकारी ऑनलाईन सहभागी होणार आहेत. त्यामुळे या बैठकीत काय निर्णय होतो, यावर उपोषणाचे भवितव्य अवलंबून आहे. मात्र या बैठकीला पालकमंत्री, खासदार, आमदार यांना निमंत्रित करण्यात आलेले नाही. त्यामुळे ते बैठकीला उपस्थित राहणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.