क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
सातव्या हिरो इंडियन सुपरलीग फुटबॉल स्पर्धेत शनिवारी वास्कोतील टिळक मैदानावर जमशेदपूर एफसी आणि मुंबई सिटी एफसी यांच्यात लढत होईल. मुंबई सिटीचे 17 सामन्यांतून सहा विजय, नऊ बरोबरी आणि तीन पराभवाने 27 गुण झाले असून ते दुसऱया स्थानावर आहेत. जमशेदपूर एफसीचे 18 सामन्यांतील पाच विजय, सहा बरोबरी आणि सात पराभवाने 21 गुण झाले असून ते सातव्या स्थानावर आहेत.
जमशेदपूर एफसीच्या बाद फेरीच्या आशा अंधुक आहेत. उरलेले दोन सामने जिंकणे आणि इतर चार संघांचे निकाल अनुकूल ठरणे त्यांना अनिवार्य आहे. तसे घडण्याची शक्यता फार कमी असली तरी जमशेदपूरचे प्रशिक्षक ओवेन कॉयल यांनी मोसमाची सांगता सकारात्मक करण्यासाठी संघाने सर्वोत्तम प्रयत्न करण्याची गरज असल्याचे नमूद केले.
गोलमुळे सामने जिंकता येतात, पण जमशेदपूरला यंदाच्या मोसमात गोल करण्यासाठी संघर्ष करावा लागला आहे. त्यांच्या आघाडीफळीला सातत्य राखता आले नसून या बाबतीत त्यांचा संघ तळात आहे. गेल्या सहा सामन्यांत त्यांना तीनच गोल करता आले आहेत.
अपेक्षित निकाल साध्य करण्यासाठी सांघिक प्रयत्नांची गरज असल्याचे कॉयल यांनी नमूद केले. आम्ही काही ठराविक खेळाडूंवरच गोलसाठी अवलंबून राहू शकत नाही. वेगवेगळय़ा क्षेत्रांतील खेळाडूंनी या बाबतीत योगदान द्यायला हवे आणि त्यासाठी आम्हाला मेहनत घेत राहावे लागेल, असे कॉयल म्हणाले.
पहिल्या चार संघांमध्ये स्थान मिळविण्यासाठी कॉयल यांच्या संघाला दोन सामन्यांत कमाल गुण मिळवावे लागतील. त्यांची मोहिम मुंबई सिटीविरूद्ध सुरू होईल. मोसमाची सांगता भक्कम करण्यासाठी आम्हाला खात्रीपूर्वक प्रयत्न करावे लागतील, असे कॉयल म्हणाले. सहा गुण मिळवून आम्ही 27 गुणांपर्यंत जायला हवे. तीन संघांचे 27 गुण आहेत, ती संख्या गाठण्याची संधी आम्हालाही आहे. आमची अजून बेंगलोर एफसीविरुद्ध लढत आहे, जे आमच्या थोडेच पुढे आहेत. त्यामुळे खेळण्यासाठी खुप काही बाकी आहे, असे कॉयल म्हणाले.
दुसरीकडे मुंबई सिटीसाठी एएफसी चॅम्पियन्स लीगचे पात्रता स्थान महत्वाचे आहे. सर्जिओ लॉबेरा यांचा संघ सुरुवातीला घोडदौड करीत होता. नंतर त्यांची कामगिरी घसरली. गेल्या पाच सामन्यांत त्यांना एकच विजय मिळविता आला आहे. त्यामुळे त्यांना एटीके मोहन बागानविरुद्ध आघाडी गमवावी लागली आहे. मुंबईची स्थिती एका अर्थाने जमशेदपूर एफसीप्रमाणेच आहे. अव्वल स्थानासाठी त्यांना उरलेले तीन सामने जिंकणे आवश्यक
आहे.
आमच्या संघाला काही विशिष्ट क्षेत्रांत सुधारणा करावी लागेल. मेहनत करणे नेहमीच आवश्यक असल्याचे मी म्हणत असतो. आम्हाला गोल करण्याच्या अनेक संधी मिळाल्या. आम्ही सुधारणा करू शकतो याची जाणीव असणे महत्वाचे आहे. आम्हाला पुढील सामन्यांवर लक्ष केंदीत करावे लागेल. सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला संघ म्हणून खेळावे लागते, असे लॉबेरा म्हणाले.