शहरातील विविध भागातील विक्रेत्यांवर कारवाई
प्रतिनिधी / सातारा
अनलॉकनंतर पुन्हा किरकोळ विक्रेत्यांनी शहरात अतिक्रमणाचा घाट घातला आहे. या अतिक्रमणावर सातारा नगरपालिका बघ्याची भूमिका घेत असली तरी वाहतूक शाखेचे पोलीस निरिक्षक विठ्ठल शेलार यांची रोज कारवाई सुरू आहे. या कारवाईची चर्चा विक्रेत्यांच होत असून पालिकेची जबाबदारी शेलार यांच्या खांद्यावर येवून पडली आहे.
सातारा शहरातील भाजी मंडई, एसटी स्टॅड, मोती चौक ते 501 पार्टी, मंगळवार तळे रोड, सदरबाझार, पोवाईनाका, विसावा नाका या भागात रोज विक्रेत्यांची संख्या वाढत आहे. या वाढत्या संख्येमुळे वाहतुकीस वारंवार अडथळा निर्माण होत आहे. पार्किंगच्या जागेत विक्रेते अन् वाहने रस्त्यावर उभी राहत आहेत. यामुळे वाहतूक शाखेच्या पेनची कारवाई झाल्याने वाहनधारकांच्या खिशाला कात्री लागत आहे. या विक्रेत्यांना सातारा नगरपालिकेकडून जागा देण्यात आलेली नाही. जागेअभावी रस्त्यालगत यांनी विक्रीचा घाट घातला आहे. या विक्रेत्यांना रोज हटविण्याचे काम सध्या शहरात सुरू आहे. हे काम नगरपालिकेचा संबंधित विभाग करत नसून ही मोहीम वाहतूक शाखेचे पोलीस निरिक्षक विठ्ठल शेलार यांनी खांद्यावर घेतली आहे. दररोज सकाळी या विक्रेत्यांना रस्त्यावरून हटवण्यात येते. विक्रेत्यांनी आदेशाकडे दुर्लक्ष केले तर कारवाईचा बडगा ही उगारण्यात येतो. यामुळे शेलार यांची धास्ती निर्माण झालेली आहे.
मोती चौकातील अतिक्रमण झाले कमी
अनलॉकनंतर पुन्हा मोती चौक ते 501 पाटी या रस्त्यालगत दुतर्फा अतिक्रमण वाढले होते. या विक्रेत्यांना वारंवार सूचना देवून पुन्हा याच ठिकाणी विक्री करत होते. यांच्यावर पोलीस निरिक्षक शेलार यांनी कारवाई करताच विक्रेत्यांची संख्या कमी झाली आहे. रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे. यामुळे वाहनधारकांच्यात शेलाराच्या कारवाईची चर्चा सुरू आहे.