चिपळुणातील प्रकार, महापुराने केलेय होत्याचे नव्हते!
राजेश जाधव/ चिपळूण
गतवर्षी जुलै महिन्यात आलेल्या महापुराने शहरासह लगतच्या गावांतील अनेकांचे संसार वाहून नेले. हे मोडून पडलेले संसार उभे करताना काही महिलांना आजही मोठी कसरत करावी लागत आहे. काहींनी संसार उभा केला असला तरी काहीजणींना मात्र समाजाच्या मदतीची गरज आहे.
तब्बल 17 वर्षांनी पुन्हा चिपळुणात महापूर आला. मात्र यावेळची पाणी पातळी मोठी असल्याने बाजारपेठ पूर्णपणे उद्ध्दस्त झाली, तर अनेकांची घरे वाहून गेली. मात्र सध्या बाजारपेठ नव्याने उभी राहिली असून अनेकांनी आपल्या संसाराला उभारी दिली आहे. अनेकांना आजही मदतीची गरज आहे. अशा काही महिला आजही आपला संसार सावरण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे महिला दिनानिमित्त त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपल्या व्यथा ‘तरूण भारत’शी बोलताना मांडल्या.
संगीता नारकर यांना हवे डोक्यावर छत
शहरातील गोवळकोट रोड स्वाती समर्थनगरमध्ये संगीता नारकर या पती संजय नारकर यांच्यासह रहात होत्या. मात्र महापुराने त्यांच्या डोक्यावरचे छतच हिरावून नेले आहे. त्यांचे पती एका कंपनीत ठेकेदारी पध्दतीने कामाला आहेत, तर त्या अनेक वर्षे घरगुती मसाले तयार करून विकणे, घरघंटीने दळणे काढणे, फॉल, बिडीग करणे व यातून मिळणाऱया पैशातून कुटुंब चालवण्याचे काम करत होत्या. मात्र महापुरात त्यांचे उदारनिर्वाहाचे सर्व साहित्य वाहून गेल्याने त्या अडचणीत आल्या आहेत. मसाले बनवण्यासाठी त्यांनी 25 हजार रूपयांचे कर्ज काढले होते. हा सर्व मसाला वाहून गेल्याने त्यांचे कर्जही वाढत आहे. सध्या त्या मैत्रिणीकडे राहतात. त्यांना घर उभारणीसाठी दानशुरांनी मदत करण्याची गरज आहे.
रंजना सागावकरांनी चिखल उपसून उभारला संसार
मूळगाव कराड असलेल्या रंजना सागावकर या गेली 38 वर्षे मिरजोळी येथे राहत आहेत. त्याचे पती बाबूराव सागावकर हे दलवाई हायस्कूलमध्ये शिक्षक होते. त्यामुळे हे कुटुंब मिरजोळी येथे स्थायिक झाले आहे. बाबुराव सागावकर यांचे काही वर्षापूर्वी निधन झाले. त्यामुळे रंजना सागावकर या उच्चशिक्षित मुलगा सत्यजित सागावकर याच्यासह येथे राहतात. त्यांचे घरातच किराणा मालाचे दुकान आहे. त्यांच्या घरात महापुराचे 7 फूट पाणी होते. त्यामुळे संपूर्ण संसार व दुकानातील साहित्य वाहून गेले. तरीही त्यांनी 15 दिवस घरात साचलेला चिखल उपसून काढत आता नव्याने संसार उभा केला आहे. तसेच ग्रामस्थांची गैरसोय होऊ नये म्हणून आपले दुकानही पूर्वीप्रमाणेच जोमाने सुरू केले आहे. यासाठी त्यांना मुलगा सत्यजित याची मोठी मदत झाली आहे.
प्राजक्ता आगे यांच्यावर दुहेरी संकट
शहरातील गोवळकोट येथील प्राजक्ता आग्रे यांच्यावर दुहेरी संकट आले आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या पतीचे कोरोनाने निधन झाले. मुले नसल्याने हे कुटुंब शेती व जनावरे पालन करून आपला उदरनिर्वाह करत होते. मात्र पतीचे निधन व त्यानंतर आलेल्या महापुरात वाहून गेलेला गोठा व खराब झालेली शेती यामुळे नेमके काय करावे, असा प्रश्न प्राजक्ता आग्रे यांना पडला होता. मात्र तरीही या संकटांवर मात करत आपल्या जावेच्या माध्यमातून उदरनिर्वाहाचे मुख्य साधन असलेली व वाहून गेलेली शेती पुन्हा उभी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांना यासाठी त्यांचा भाऊही मदत करत आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे पतीच्या निधनानंतर काही दिवसांनी त्यांच्या दिराचेही निधन झाले. त्यामुळे सध्या त्या, जाऊ व पुतणी अशा तिघी राहतात.
अडचणीतही अनिता माळी अनेकांच्या पोशिंदा
मिरजोळी-जुवाडबेटाला पूर नवा नाही. मात्र जुलै महिन्यात वेगाने पाणी भरल्याने या बेटावर राहणारी सर्वच कुटुंबे अडकून पडली. पाणी वाढत असल्याने त्यांची घरे बुडाली. त्यामुळे अनेकांनी घराच्या माळय़ाचा आधार घेतला. अशा कठीण परिस्थितीतही अनिता अनिल माळी या 25जणांच्या पोशिंदा बनल्या. स्टोव्हवर माळय़ावरच जेवण बनवून त्या सर्वांची भूक भागवत होत्या. त्यानंतर पाणी कमी झाल्यावर या कुटुंबांना मराठी शाळेत आणण्यात आले. येथे त्यांचे महिनाभर वास्तव्य होते. यावेळीही अनेकांच्या जेवणाची जबाबदारी त्यांनी लिलया पार पाडली. त्यानंतर मराठी शाळा ते जुवाड असा प्रवास करत आपल्या घरात साठलेला चिखल काढून त्यांनी आता आपला संसार नव्याने थाटला आहे. महापुरात आलेले सर्व कटू अनुभव मागे टाकून त्या सध्या पतीला शेतीच्या कामात पूर्वीप्रमाणे मदत करत आहेत.