वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विदेशी क्रिकेटपटूंशिवाय आयपीएल स्पर्धा होवू शकत नाही, असे किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे सहमालक नेस वाडिया यांनी म्हटले आहे. या स्पर्धेचे भवितव्य बीसीसीआयच्या निर्णयावर राहील, असेही त्यांनी सांगितले. भारतामध्ये गेली काही वर्षे सातत्याने आयपीएल क्रिकेट स्पर्धा भरविली गेली आणि या स्पर्धेला शौकिनांकडून सातत्याने प्रतिसाद लाभल्याने या स्पर्धेने अमाप प्रसिद्धी मिळविली. विदेशातही आयपीएल स्पर्धेच्या धरतीवर क्रिकेट स्पर्धा भरविल्या जात आहेत. 2020 आयपीएल स्पर्धेत कोरोना महामारी संकटाने मोठा अडथळा आणल्याने सदर स्पर्धा बेमुदत लांबणीवर टाकण्याचा निर्णय स्पर्धा आयोजकांनी घेतला आहे. आयपीएल स्पर्धा आतापर्यंत विदेशी क्रिकेटपटूंच्या सहभागामुळे अधिक गाजत आहेत.
आयपीएल स्पर्धा स्थगित केल्याने भारतीय क्रिकेट मंडळाला मोठय़ा आर्थिक नुकसानीला तोंड द्यावे लागणार आहे. सदर स्पर्धा यावर्षी घेतली गेली नाही तर बीसीसीआयचे सुमारे 4 हजार कोटी रूपयांचे नुकसान होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. देशातील कोरोना परिस्थिती अद्याप नियंत्रणाखाली नसल्याने या स्पर्धेची पुढील तारीख सध्या ठरविणे अवघड आहे.
आयपीएल स्पर्धेचे इच्छूक यजमानपद भूषविण्यासाठी बीसीसीआयने येत्या सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये विंडो खुली करण्याचे ठरविले आहे. ऑस्ट्रेलियात येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर आयसीसीची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा भरविली जाणार आहे. जर ही स्पर्धा लांबणीवर टाकली गेली तर आयपीएल स्पर्धा भारतात सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान घेतली जावू शकेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
प्रचंड रकमेची ही आयपीएल क्रिकेट स्पर्धा चालूवर्षी कशी घ्यावयाची या संदर्भात विविध संघांच्या फ्रांच्यायजींनी समिश्र मते मांडली. भारतीय क्रिकेटने आयपीएल स्पर्धेला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून दिला आहे. आता जागतिक क्रिकेट क्षेत्रामध्ये आयपीएल स्पर्धेला प्रतिष्ठा आणि महत्त्व प्राप्त झाले आहे. दरम्यान या स्पर्धेला आंतरराष्ट्रीय व्यासपीठ आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंची जरूरी असल्याचे मत वाडिया यांनी व्यक्त केले.