धारबांदोडात विद्यापीठासाठी 2 लाख चौ. मी. जमीन दिल्याचे सांगून प्रत्यक्षात दिली : 4 लाख चौ. मी. आमदार प्रसाद गावकर यांचा आरोप
प्रतिनिधी /पणजी
धारबांदोडा येथे नुकतीच पायाभरणी करण्यात आलेल्या राष्ट्रीय फोरेन्सिक सायन्स विद्यापीठासाठी संजीवनी सहकारी साखर कारखान्याच्या मालकीची दोन लाख चौ. मी. जमीन दिल्याचे विधानसभेत सांगणाऱया मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या पॅम्पससाठी प्रत्यक्षात मात्र चार लाख चौ. मी. जमीन दिल्याचे उघडकीस आले आहे. त्यावरून विधानसभेच्या पवित्र सभागृहातसुद्धा मुख्यमंत्री खोटे बोलत असल्याचे सिद्ध झाले आहे, असा गंभीर आरोप आमदार प्रसाद गावकर यांनी केला आहे.
पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यापूर्वी याच मुख्यमंत्र्यांनी आयआयटी पॅम्पसच्या नावाखाली मेळावली येथील लाखो चौ. मी. जमीन त्या संस्थेच्या ताब्यात देण्यात आली होती. सध्या तो प्रकल्प रद्द झालेला असला तरीही तेथील कित्येक कुटुंबांना अद्याप न्याय मिळालेला नाही. आता संजीवनीच्या मालकीच्या 14 लाख चौ. मी. जमिनीवर या सरकारचा डोळा असून त्यातीलच चार लाख चौ. मी. जमीन सदर विद्यापीठासाठी देऊन मेळावलीची पुनरावृत्ती करण्यात आली आहे, असे गांवकर म्हणाले. मात्र ते करताना भर विधानसभेत मुख्यमंत्री धडधडीत खोटे बोलले असून विधानसभेचे पावित्र्य त्यांनी भंग केले आहे, असा आरोप गांवकर यांनी केला आहे.
संजीवनीच्या जमिनीसंबंधी मुख्यमंत्री विधानसभेत एक बोलले आणि अधिवेशन संपल्याच्या दुसऱयाच दिवशी एक दस्तावेज आपल्या हाती लागला त्यात ती जमीन दोन नव्हे तर चक्क लाख चौ. मी. सदर विद्यापीठाच्या ताब्यात देण्यात आल्याचे दिसून आले. प्रत्यक्षात हे आदेशपत्र अधिवेशनाच्या दुसऱयाच दिवशी म्हणजे 19 ऑक्टोबर रोजीच जारी करण्यात आले होते, त्याची प्रत दुसऱया दिवशी मिळाली असे गावकर यांनी सांगितले.
दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालय (महसूल शाखेतर्फे) सदर पत्र जारी केले असून त्याची प्रत कृषी संचालकांनाही पाठविण्यात आली आहे. सदर पत्रानुसार राष्ट्रीय फोरेन्सिक सायन्स विद्यापीठ आणि आंतरराष्ट्रीय कायदा विद्यापीठ अशा दोन संस्था स्थापन करण्यासाठी देण्यात येत असल्याचे म्हटले आहे. सदर जमीन धारबांदोडा तालुक्यातील पिळये गावच्या सर्व्हे क्र. 30/1 मधील आहे, असे गावकर यांनी सांगितले. दोन आठवडय़ांपूर्वी गोव्यात आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याहस्ते या विद्यापीठाची पायाभरणी करण्यात आली होती.