प्रतिनिधी /बेळगाव
राज्यासह शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. तरीदेखील मास्क वापरण्याकडे शहरवासियांचे दुर्लक्ष झाले आहे. मास्क वापरण्याबाबत जनजागृती करून दंडात्मक कारवाईचा इशारा महापालिकेकडून देण्यात आला आहे. तरीदेखील विनामास्क फिरणाऱयांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. त्यामुळे विविध ठिकाणी दंड वसुलीची मोहीम राबविण्यात येत असून शुक्रवारी 6900 रुपये दंड वसूल केला.
कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. बाजारपेठेत गर्दी करू नये, मास्क वापरण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात येत आहे. कोरोना नियमावलीचे पालन करण्याची सूचना बाजारपेठेत करण्यात येत आहे. तसेच विनामास्क फिरणाऱयांकडून 250 रुपये दंड वसूल करण्यात येईल, असा इशारादेखील देण्यात येत आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करून नागरिक विनामास्क फिरत असल्याचे निदर्शनास येत आहे. लस घेतली असल्याचे सांगून काही नागरिक बाजारपेठेत विनामास्क व्यवसाय करीत आहेत. तर काही नागरिक विनामास्क फिरत आहेत. त्यामुळे महापालिकेला दंडात्मक कारवाईचा बडगा उगारावा लागत आहे.
विविध चौक, प्रमुख रस्ते आणि बाजारपेठेत विनामास्क फिरणाऱयांना अडवून 250 रुपये दंड वसूल करण्यात येत आहे. शुक्रवारी विविध भागात कारवाई करून विनामास्क फिरणाऱयांकडून 6900 रुपये दंड वसूल करण्याची मोहीम महापालिकेने राबविली. 10 रुपयाच्या मास्ककरिता 250 रु. दंड भरू नका, असे आवाहन करूनही नागरिक दुर्लक्ष करीत आहेत. स्वतःच्या व कुटुंबाच्या सुरक्षेसाठी मास्क वापरा, असे आवाहन करून देखील नागरिकांनी कानाडोळा केला आहे. त्यामुळे विनामास्क दंड वसुलीची मोहीम तीव्रपणे राबविण्यात येत आहे. गेल्या चार दिवसांत 40 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.