प्रतिनिधी/ बेळगाव
शहरात विनामास्क फिरणाऱयांवर महापालिकेच्यावतीने कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. शुक्रवारपासून ही कारवाई तीव्रपणे राबविण्यात येत असून विनामास्क फिरणाऱया नागरिकांकडून दंड वसुलीची मोहीम सुरू आहे. आतापर्यंत चार लाख रुपये दंड महापालिका प्रशासनाने वसूल केला आहे.
कोरोना विषाणूंचा प्रसार वाढत असल्याने मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र शहरातील व्यापारी, फेरीवाले तसेच नागरिक बाजारपेठ आणि गर्दीच्या ठिकाणी विनामास्क फिरत असल्याचे निदर्शनास येत आहे. कोरोना विषाणूंच्या बाधितांची संख्या वाढत असतानादेखील मास्क वापरण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे विनामास्क फिरणाऱयांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. मास्क वापरण्याचे आवाहन केलेल्या दुसऱया दिवशीपासूनच महापालिका प्रशासनाने ही कारवाई तीव्रपणे राबविण्यास प्रारंभ केला आहे. बाजारपेठ, विविध चौक आणि ठिकठिकाणी थांबून विनामास्क फिरणाऱया नागरिकांकडून दंड वसुली करण्यात येत आहे. महापालिकेच्या सर्व विभागातील कर्मचाऱयांसह अधिकाऱयांना या कामी जुंपण्यात आले आहे. त्यामुळे ठिकठिकाणी राबविण्यात आलेल्या कारवाईच्या माध्यमातून विनामास्क फिरणाऱया नागरिकांकडून शुक्रवारी दिवसभरात एक लाख रुपये दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई रविवारी सुटीच्या दिवशीदेखील सुरू ठेवण्यात आली होती. मास्क वापरण्याचे आवाहन करूनही दुर्लक्ष करण्यात येत असल्याने महापालिकेकडून ही कारवाई सातत्याने करण्यात येत आहे. रविवारपर्यंत चार हजारहून अधिक नागरिकांवर कारवाई करून चार लाखाहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे.
विनाहेल्मेट धारकांवरही कारवाई
शहरात विनाहेल्मेट फिरणाऱया दुचाकी वाहनचालकांवर रहदारी पोलीस खात्याकडून कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे हेल्मेट वापरण्यात येत आहे. पण डोक्मयावर हेल्मेट असताना विनामास्क दिसल्यास त्यांच्यावरही कारवाईचा बडगा महापालिकेकडून उगारण्यात येत आहे. त्यामुळे वाहनचालकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. फेसशिल्ड असलेले हेल्मेट दुचाकी वाहनचालक घालत असल्याने मास्क घालत नाहीत. पण विविध चौकात थांबलेले महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी हेल्मेटधारक वाहनचालकांची अडवणूक करून दंड वसूल करीत असल्याची तक्रार होत आहे.
दंडाचा विनियोग महापालिका कोणत्या कामासाठी करणार?
विनामास्क फिरणाऱया नागरिकांकडून 100 रुपये दंड जमा करून घेण्यात येत आहे. पण या दंडाचा विनियोग महापालिका कोणत्या कामासाठी करणार, असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. कोरोना विषाणूंपासून बचाव करण्यासाठी मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पण दंड भरल्यानंतर हे उद्दिष्ट साध्य होते का? असा मुद्दा उपस्थित झाला आहे. 100 रुपये दंड भरल्यानंतर वाहनचालक विनामास्क फिरत असतात. त्यामुळे दंड भरणाऱया नागरिकांना तात्काळ मास्क उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी होत आहे.