प्रतिनिधी/ म्हसवड
मी जलसंधारण सचिव असताना जलयुक्त शिवारच्या माध्यमातून माणमध्ये 75 कोटी रुपयांचे सिमेंट बंधारे मंजूर केले. पण त्याचा कधी ढोल पिटला नाही. कारण ते आमचं कर्तव्य होतं. विरळी खोयाचं हक्काचं टेंभूचं पाणी विरळीला निश्चितपणे मिळेल आणि ते आम्हीच महाविकास आघाडीच्या माध्यमातून आणणार अशी ग्वाही राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांनी दिली. तसेच पोलिसांच्या भितीने व्यासपीठावरून पळून जाणायांनी व भानगडी करणायांनी जामीनाची चिंता करावी असा टोलाही त्यांनी लगावला.
विरळी (ता. माण) येथे राष्ट्रवादी काँग्रेस आयोजित भव्य शेतकरी मेळावा व कर्तृत्ववान नागरिकांच्या सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी युवकचे प्रदेश सरचिटणीस अभयसिंह जगताप, तालुकाध्यक्ष बाळासाहेब सावंत, माजी सभापती श्रीराम पाटील, संजय जाधव, दादासाहेब मडके, संजय जगताप, बाळासाहेब काळे, प्रशांत विरकर, विक्रम शिंगाडे, सिध्देश्वर काळेल, संजय खिलारी, रामभाऊ झिमल, विजय जगताप, मधुकर झेडगे, अंकुश गाढवे, शरद काळेल आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रभाकर देशमुख म्हणाले, माजी आमदार (कै.) सदाशिवराव पोळ यांनी व (कै.) खाशेराव जगताप यांनी खुप चांगले काम उभे केले. त्यांच्यात काही मतभेद असून सुध्दा एकमेकांचा सन्मान ठेवून समाजासाठी राबणारी मंडळी होती. पण नेहमीप्रमाणे आपले लोकप्रतिनिधी संतुलन गेल्याने बरळत असून माण तालुक्याच्या संस्कृतीला न शोभणारी वक्तव्य करत आहेत. शिक्षण, रोजगार, आरोग्य, पाणी यावर त्यांनी बोललं पाहिजे पण ते बोलत नाहीत. एमआयडीसीची अद्याप अधिसूचना झालेली नाही. पण एमआयडीसीचं खरं श्रेय आमच्या अधिकारी सुपुत्रांचं आहे. अजित दादांनी स्पष्ट सांगितलंय कुणी काही म्हणोत एमआयडीसी माणमधून जाणार नाही.
प्रभाकर देशमुख पुढे म्हणाले, या भागाला आतापर्यंत टेंभूचे पाणी न मिळण्याचं पाप या निक्रिय आमदारांनी केलंय. त्यांनी पाण्यासाठी प्रतिष्ठा पणाला न लावता पनवेलला पुनर्वसनाचे भूखंड मिळविण्यासाठी लावली. मग ज्या भानगडी झाल्या त्या तुम्हालाच निस्तराव्या लागणार ना. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व देवेंद्र फडणवीस यांनी मला निर्दोष ठरवलंय. खंडणी व विनयभंगाची तक्रार ज्यांच्यावर आहे त्यांनी जामिनासाठी घाबरावं. जातीचं विष पेरण्याचं काम यांनी केलं. माणसांना उभं करण्याऐवजी त्यांची डोकी फोडण्याचं काम केलं. आंधळी प्रकरणात ज्यांचं आयुष्य उध्वस्त झालंय त्याची जबाबदारी कोण घेणार? या लबाडाची लबाडी वडूज व दहिवडीतील जनतेनं ओळखली असून आता माण-खटाव मधील गावागावातील जनता ओळखू लागली आहे. त्यामुळे त्यांचं नियंत्रण सुटू लागलं आहे.
शिळ्या कढीला ऊत आणणायांनी आपण काचेच्या घरात राहतो हे लक्षात ठेवावं असा इशाराही त्यांनी दिला.
अभयसिंह जगताप म्हणाले, विरळी खोर्याने आमच्या कुटुंबाला भरभरुन प्रेम दिले. पाणी आंदोलनात या पंचक्रोशीने हिरहिरीने भाग घेतला. परंतू पाणी देताना यांच्यावर अन्याय झाला. अजूनही इथली माणसं पाण्यासाठी झगडत आहेत. यापुढील काळात या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
दादासाहेब मडके व प्रशांत विरकर म्हणाले राष्ट्रवादी कधी केलेल्या कामाची जाहिरात करत नाही अन न केलेल्या कामाचं श्रेय घेत नाही. पण विरोधकांचं या उलट आहे. काम कुणीही करा उद्घाटनला सर्वप्रथम हेच हजर असतात. विक्रम शिंगाडे म्हणाले वरकुटे मलवडी परिसरातील पाच गावांना कधीच पाणी येणार नाही असं म्हणणार्यांना मला सांगायचं आहे आमच्या गावांमध्ये पाणी आलंय अन ते प्रभाकर देशमुख यांनी आणलंय. पोरगं झालं कोणाला अन बारसं घालतंय कोण? अशी अवस्था आमदाराची आहे.
विश्वनाथ नलवडे म्हणाले माणमधील शेवटच्या टोकाच्या या गावात शरद पवार यांच्यामुळे दहा सिमेंट बंधारे बांधले गेले. यासारखी कोटय़ावधीची कामे या गावात राष्ट्रवादीमुळेच झाली.
शरद गोरड यांनी सुत्रसंचालन केले तर वैभव गोरड यांनी आभार मानले.