जिल्हापंचायत सदस्य रुपेश नाईक
प्रतिनिधी/ म्हापसा
रेईश मागूस जिल्हा पंचायत सदस्य रुपेश नाईक यांनी भाजपा सदस्यत्वाचा आपला राजिनामा पक्ष नेतृत्वाकडे दिल्याची अफवा सोशल मिडीयावरून पसरविण्यात येत आहे. साळगाव मतदारसंघातील सर्व मतदारांनी व भाजपा कार्यकर्त्यांनी विश्वास ठेऊ नये. आपला पूर्ण विश्वास भाजपा पक्ष नेतृत्वावर व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर आहे. त्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांनी गोंधळून जाऊ नये असे आवाहन रेईश मागूस जिल्हा पंचायत मतदारसंघाचे विजयी उमेदवार रुपेश नाईक यांनी आज म्हापसा येथील उत्तर गोवा भाजपा कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले.
यावेळी रेईश मागूस सरपंच केदार नाईक, साळगाव मतदारसंघाचे उपाध्यक्ष शांबा तुयेकर, पंच शशिकला गोवेकर, पीळर्ण सरपंच संदीप बांदोडकर, सांगोल्डा सरपंच अविनाश नाईक उपस्थित होते. जिल्हा परिषद सदस्य रुपेश नाईक यांनी पुढे सांगितले की, भाजपाचे विरोधक अशा प्रकारे अफवा पसरवित आहे. जो उमेदवार 3060 मतांची आघाडी घेऊन निवडून आला आहे तो विजयी उमेदवार राजिनामा देणार का? असा खोटा प्रचार करून साळगाव मतदारसंघातील मतदारांचा व भाजपा कार्यकर्त्यांच्या गोंधळाचे वातावरण निर्माण केले जात आहे. मागच्या पाच वर्षाच्या काळात भाजपा नेतृत्वाने चांगले सहकार्य दिले आहे. प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, संघटन मंत्री सतीश धोंड, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे मला वेळोवेळी साळगाव मतदारसंघाच्या विकासासाठी उत्तम सहकार्य लाभले आहे. मी नेहमी साळगाव मतदारसंघाच्या समस्या घेऊन पक्ष नेतृत्वाकडे चर्चा करीत असतो. साळगावचा विकास हेच माझे ध्येय आहे असे त्यांनी सांगितले.
22 मार्च पूर्वी माझ्या रेईश मागूस मतदारसंघातील सर्व सरपंच, पंच, भाजपा कार्यकर्त्यांनी माझ्या विजयासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. त्यांच्या मेहनतीमुळे मला 3060 मतांची आघाडी मिळू शकली. पक्ष नेतृत्वाचा, कार्यकर्त्यांचा व मतदारांचा माझ्या विजयामागे मोठा सिंहाचा वाटा आहे. मागच्या पाच वर्षामध्ये मतदारांनी माझ्यावर पूर्ण विश्वास दाखविला आहे. आम्ही सर्वजण एकसंघ आहोत व एकत्र राहून साळगाव मतदारसंघाचा विकास करणार आहे.
अफवा पसरविणाऱयांच्या किंवा त्या वर्तमान पत्राच्या विरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार नाही. राजकारणात अफवा पसरविल्या जातात यांची मला कल्पना आहे. कुठल्याही मतदारांनी किंवा भाजपा कार्यकर्त्यांनी गोंधळून जाऊ नये म्हणून मी हे स्पष्टीकरण देत आहे असे रुपेश नाईक यांनी सांगितले.
उत्तर गोवा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत मी नाही. पक्ष जी जबाबदारी देईल ती मी स्विकारणार आहे. पक्ष नेतृत्वाने अध्यक्षपदाची ऑफर दिल्यास मी आनंदाने स्विकारणार आहे. भाजपाच्या नेतृत्वाने आजपर्यंत योग्य निर्णय घेतले आहेत. आजपर्यंत साळगाव मतदारसंघात कुठल्याच भाजपा कार्यकर्त्यांमध्ये असंतोष नाही असे शांबा तुयेकर यांनी सांगितले.