वृत्तसंस्था/ गुटमेला
विश्वचषक स्टेज-1 तिरंदाजी स्पर्धेला येथे मंगळवारपासून प्रारंभ होत आहे. या स्पर्धेत दर्जेदार कामगिरी करण्यासाठी भारताचे तिरंदाजपटू अतेनू दास आणि दीपिकाकुमारी सज्ज झाल्या आहेत.
कोरोना महामारी समस्येमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील तिरंदाजी स्पर्धा तब्बल 18 महिन्यांच्या कालावधीनंतर गुटमेला शहरात घेतली जात आहेत. यापूर्वीची आंतर राष्ट्रीय स्तरावरील विश्वचषक तिरंदाजी स्पर्धा मॉस्कोमध्ये घेण्यात आली होती आणि या स्पर्धेमध्ये दास आणि दीपिकाकुमारी यांची कामगिरी दर्जेदार झाली होती. मंगळवारपासून सुरू होणाऱया या स्पर्धेत आशिया खंडातील बलाढय़ देश कोरिया, चीन, चीन तैपेई आणि तुर्की हे सहभागी होणार नाहीत.
टोकियो ऑलिंपिक स्पर्धेसाठी अतेनु दास आणि दीपिकाकुमारी हे भारतीय तिरंदाज दर्जेदार कामगिरी करण्यासाठी आतुरलेले आहेत. या स्पर्धेत विविध देशांचे 150 तिरंदाजपटू सहभागी होत आहेत. या स्पर्धेत भारताला पदक मिळविण्याची संधी उपलब्ध झाली आहे.