जांबोटीतील तालुकास्तरीय क्रीडा महोत्सव उद्घाटन सोहळय़ात मिस्टर इंडिया सुनील आपटेकर यांचे प्रतिपादन
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
आपल्या प्रत्येकात एक आंतरिक शक्ती असते. आपले शरीर हे पंचमहाभूतांनी बनले आहे, विश्वातील साऱया शक्ती आपल्यात आहेत, त्या स्वतः शोधाव्या लागतात, असे स्वामी विवेकानंद म्हणायचे. आजच्या घडीला नीरज चोप्रासारखे भालाफेकीत ऑलिम्पिक सुवर्ण जिंकावे, पीव्ही सिंधूप्रमाणे दुहेरी ऑलिम्पिक पदके जिंकावीत, असे प्रत्येक खेळाडूला वाटते आणि यात काहीही गैर नाही. प्रत्येक खेळाडू अव्वल तोडीचा होईल, असे नाही. पण, तंत्रशुद्ध मार्गदर्शन व त्याला अपार मेहनतीची जोड दिली तर आपल्या आवडीच्या क्षेत्रात अनेक क्षितिजे पादाक्रांत करता येतील, असे प्रतिपादन मिस्टर इंडिया सुनील आपटेकर यांनी केले. जांबोटी येथील बाबुराव ठाकुर पदवीपूर्व महाविद्यालयात आयोजित तालुकास्तरीय क्रीडा महोत्सवातील उद्घाटन सोहळय़ाप्रसंगी ते प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते.
दिग्गज खेळाडूंचे यश आपण पाहतो, आपल्याला फक्त त्यांची सुवर्णपदके दिसतात. पण, त्यामागे प्रचंड सराव असतो. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक धडे आत्मसात केलेले असतात आणि झालेल्या चुका दुरुस्त केलेल्या असतात. आपण जे करतो, तेच चॅम्पियनही करत असतात. पण, फक्त त्यांची पद्धत वेगळी असते. खेळ व शिक्षण या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून त्याचा योग्य समतोल साधावा, असे ते पुढे म्हणाले. विदेशातील स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी सुरेश हुंदरे, किरण ठाकुर यांचे बहुमोल सहाय्य लाभले, याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
पाच ग्रॅम सोने काढण्यासाठीही हजारो टन मातीचा उपसा करावा लागतो. यासाठी कष्ट घेण्याची तयारी ठेवावी, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. शक्तीचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी व्यसनाच्या आहारी जाऊ नये, असे आवाहन केले.
‘माझे वडील लष्करात होते. लष्करातील प्रशिक्षण कठीण असायचे. ‘ट्रेनिंग के वक्त बहाया गया पसीना लडाई मे खून बचाता है’, हे त्यांचे स्लोगन असायचे. मी या स्लोगनमध्ये ‘ट्रेनिंग के वक्त बहाया गया पसीना मुझे नॅशनल्स-इंटरनॅशनल्स मे गोल्ड दिलायेगा’, असा बदल केला आणि ज्या छातीसाठी रिजेक्ट केले गेले होते, त्याच छातीच्या बळावर आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवल्या, असे सुनील आपटेकर शेवटी म्हणाले.
प्रारंभी ध्वजारोहण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. महाविद्यालयाच्या वतीने मान्यवरांचे स्वागत केले गेले आणि त्यानंतर प्रतिमापूजन, दीपप्रज्वलन करण्यात आले. ईशस्तवनाने कार्यक्रमाची उंची आणखी वाढविली. तालुक्यातील 15 संघ स्पर्धेत सहभागी झाले
आहेत.
महाविद्यालयाच्या प्राचार्या पूजा पाटकर, तरुण भारतचे प्रशासकीय अधिकारी गिरिधर रवी शंकर, महाविद्यालयाचे संचालक नितीन कपिलेश्वरकर, आण्णासाहेब कुरतुडकर, जयराम देसाई, श्रीधर हिरेमठ, विवेक कुलकर्णी आदी उपस्थित होते. कृष्णा पाटील यांनी सूत्रसंचालन करुन आभार मानले.
अपार कष्ट घ्या, समाधान निश्चितच मिळेल!
सध्या जमाना शॉर्टकट्स शोधण्याचा झाला आहे. पण, तसे होऊ देऊ नका. अपार कष्ट घ्या. कष्टामुळे यश मिळेलच, याची खात्री कधीही देता येणार नाही. पण, कष्ट घेतले आणि एखादवेळेस यशाने हुलकावणी दिली तरी समाधान निश्चितच मिळेल, ते समाधान आपण प्रयत्नात कसूर केली नाही, याचे असेल, असे आपटेकर याप्रसंगी म्हणाले.
एअरफोर्समध्ये रिजेक्ट झालो आणि तोच आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला!
‘1981 मध्ये मी एअरफोर्सच्या सिलेक्शनला गेलो होतो. पण, तेथे छातीत कमी पडल्यामुळे रिजेक्ट झालो. घरी गेल्यानंतर आणखी एक कारण झाले आणि वडिलांकडून मार खावा लागला. वडिलांनी फर्मान सोडले, उद्यापासून व्यायाम शाळेत जाऊन व्यायाम करायचा. दुसऱया दिवशी मी व्यायामशाळेत पाय ठेवले आणि व्यायामाशी, शरीरसौष्ठवाशी जुळवून घेतल्यानंतर माझे आयुष्यच बदलून गेले’, या आठवणीला आपटेकर यांनी यावेळी उजाळा दिला.
मिस्टर इंडिया स्पर्धेत स्वतःला आजमावले आणि कारकिर्दीला कलाटणी मिळाली!
एक काळ असाही होता, ज्यावेळी बेळगावचे शरीरसौष्ठवपटू मिस्टर इंडिया स्पर्धेत फारसे सहभागी होत नसत. याचे कारण असे, विजेतेपदे नेहमी मुंबईच्या शरीरसौष्ठवपटूंकडेच असायची. मात्र, या परंपरेला छेद देण्यासाठी आपटेकर यांनी त्या स्पर्धेत भाग घेतला, त्यात मुंबईचे 25 शरीरसौष्ठवपटू होते आणि सातवा क्रमांकही मिळवला. त्या स्पर्धेतील पहिल्या 6 क्रमांकाचे शरीरसौष्ठवपटू हे मिस्टर इंडियामध्ये पहिल्या-दुसऱया स्थानी आलेले होते. आपटेकर यांना त्या पहिल्यावहिल्या निर्भेळ यशानंतर मागे वळून पहावे लागले नाही.