अचूक बातमी “तरुण भारत”ची, सोमवार, 12 जुलै 2021, सकाळी 11.00
● रविवारी रात्री अहवालात 576 बाधित ● जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी दर 5.84 ● Rt-pcr टेस्टिंग पॉझिटिव्हिटी दर 6.07 ● लॉकडाऊनमुळे सामान्यांचे हाल ● जिल्ह्यात 2,910 बेड रिक्त ● मृत्यू सत्र थांबत नसल्याची चिंता ● सर्वाधिक सक्रीय रुग्ण पुणे जिह्यात
सातारा / प्रतिनिधी :
गेल्या दोन दिवस हजाराकडे झेपावलेल्या बाधित वाढीच्या आकड्यांचा वेग शनिवारच्या अहवालात मंदावल्याचा दिलासा असताना रविवारी रात्री आलेल्या अहवालात देखील तो खाली घसरुन केवळ 576 जणांचा अहवाल बाधित आला आहे. यामध्ये जिल्हय़ाचा पॉझिटिव्हीटी दर कमी झाला असला तरी बाधितांच्या दैनंदिन मृत्यूचे सत्र थांबत नसल्याने चिंता वाढतच असते. एकूण सध्या जिल्हय़ात वेग मंदावत असला तरी तो सतत खालीवर होत असून थांबत नसल्याने फारसा दिलासादायक नाही. मुंबई, पुण्यापेक्षा जास्त बाधित सध्या जिल्हयात होत असल्याने यातून लवकर सावरण्यासाठी काम करावे लागणार आहे.
पॉझिटिव्हिटी दर खाली घसरला
दरम्यान, शनिवारी रात्री आलेल्या अहवालानुसार 576 जणांचा अहवाल बाधित आलेला आहे. यामध्ये जिल्हय़ाचा एकूण पॉझिटिव्हिटी दर 5.84 एवढा कमी राहिलेला असून यात 9,842 जणांच्या तपासण्या झालेले आहेत. यामध्ये 5,330 जणांच्या रॅपिड अँटीजन टेस्ट झालेले असून यामध्ये 301 जणांचे अहवाल बाधित आहे तर 4,512 जणांची आरटीपीसीआर टेस्ट झालेली असून यामध्ये 274 जणांचा अहवाल बाधित आलेला आहे. यामुळे आरटीपीसीआर टेस्टिंगचा पॉझिटिव्हिटी दर खाली घसरला असून, तो 6.07 एवढा आहे.
लॉकडाऊनला लोक आता कंटाळलेत
गेल्या वर्षभरापासून सातत्याने लॉकडाऊन सुरु आहे. काही महिने सोडले तर पुन्हा पुन्हा लॉकडाऊनमुळे सर्वच क्षेत्रावर त्याचा विपरित परिणाम झालाय. सामाजिक मानसिक, आरोग्यचाही आता गांभीर्याने विचार करावा लागणार आहे. विद्यार्थी, विद्यार्थिनी घरी बसून अभ्यास करत असले तरी त्यांचे भावविश्व मोठया प्रमाणावर बदलले आहे. शाळा, महाविद्यालयांच्या इमारती वर्षभरापासून तशाच निश्चलपणे उभ्या आहेत. आरंभीचे काही दिवस लॉकडाऊन पाळताना कोरोनाची भीती असल्याने लोक घरातही बसले. मात्र, ज्यांचे हातावरचे पोट आहे अशी हजारो माणसे लॉकडाऊन कधी एकदाचा संपतोय म्हणून वाट पहात आहे. कारण त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर होवू लागला आहे.
महाबळेश्वर तालुका सावरलाय
महाबळेश्वर तालुक्यातील बाधित वाढीचा वेग मोठया प्रमाणात खाली घसरला आहे. तर इतर वाई, फलटण, जावली, पाटण, खटाव, माण, कोरेगाव, खंडाळा तालुके चांगलेच सावरले आहेत. या तालुक्यातील वाढ दोन अंकावर आली असून यामध्ये महाबळेश्वर तालुक्याला चांगला दिलासा लाभला आहे. विषय राहिला आहे तो फक्त सातारा व कराड तालुक्यांचा. कराडमध्ये पुन्हा कोरोनाने हाहाकार सुरु केला असून यातून सावरण्यासाठी या दोन्ही तालुक्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत.
राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण पुणे जिल्ह्यात
राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे जिल्ह्यात हा आकडा 19 हजार 034 इतका आहे. तर, पुण्याच्या खालोखाल ठाणे जिल्ह्यात एकूण 16 हजार 626 इतके रुग्ण आहेत. त्यानंतर कोल्हापुरात ही संख्या 13 हजार 157 इतकी आहे. मुंबई महापालिका हद्दीत सध्या 11 हजार 423 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सांगलीत ही संख्या 11 हजार 717, साताऱ्यात ही संख्या 9 हजार 912, रायगडमध्ये 4 हजार 325, रत्नागिरीत 3 हजार 569, सिंधुदुर्गात 3 हजार 524, नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या 3 हजार 652 इतकी आहे. तर नागपूर जिह्यात ही संख्या 2 हजार 301 इतकी झाली आहे.
रविवारपर्यंत जिल्हयात एकूण नमूने 11,79,678, एकूण बाधित 2,03,212, एकूण कोरोनामुक्त 1,89,231, मृत्यू 4,906 उपचारार्थ रुग्ण 9,912
रविवारी जिल्हय़ात बाधित 786, मुक्त 172, बळी 18