शेअर ब्रोकर नितीन कामत यांचे मत : 2009 मध्ये ‘झेरोदा’ कंपनी सुरू : फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीत 90 वा क्रमांक : तरुण भारतला दिली खास मुलाखत
मनीषा सुभेदार / बेळगाव
कोणताही उद्योग, व्यवसाय किंवा संस्था यामध्ये नातेसंबंधांची सरमिसळ करता कामा नये, एकाच कुटुंबातील अनेक व्यक्ती उद्योग समुहात असल्या तरी उद्योगाशी पूरक असे औद्योगिक व व्यवस्थापकीय धोरण तेथे राबवायला हवे. कारण कोणताही व्यवसाय हा बाजारपेठेतील त्या व्यवसायाची ‘पत’ किती यावर ओळखला जातो. म्हणूनच वित्तीय क्षेत्रात तरी नाते बाजूला ठेवायला हवे, असे मत नितीन कामत या तरुण उद्योजकाने व्यक्त केले.
नितीन व निखिल कामत हे दोघेही ‘झेरोदा फौंडर्स’ ही
स्टॉक ब्रोकर कंपनी चालवितात. उद्योग विश्वाला वाहिलेल्या फोर्ब्स इंडिया या मासिकाने भारतातील पहिल्या शंभर श्रीमंत व्यक्तींमध्ये निवड केली आहे. या दोघांना श्रीमंतांच्या यादीत 90 वा क्रमांक मिळाला आहे. नितीन कामत हे बेळगावचे जावई असून, नुकतेच ते बेळगावमधील त्यांचे स्नेही व उद्योजक अल्पेश जैन यांच्याकडे आले होते. त्यांच्या निवासस्थानी ‘तरुण भारत’ला विशेष मुलाखत देताना त्यांनी उपरोक्त मत व्यक्त केले.
या क्षेत्राकडे कसे वळलात, या प्रश्नावर ते म्हणाले, माझा जन्म शिमोग्याचा, माझे वडील कॅनरा बँकेत होते. त्यांच्या बदलीमुळे बालपणीच मी खूप भ्रमंती केली आहे. इयत्ता 9 वीपासून मी बेंगळूरमध्येच असून तेथेच अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. 17 व्यावषी टेडिंगला सुरुवात केली. काहीकाळ मी ‘रिलायन्स मनी’ मध्ये होतो. त्यानंतर 2009 मध्ये ‘झेरोदा’ कंपनी सुरू केली. नंतर माझा भाऊ निखिल माझ्यासमवेत कंपनीत रूजू झाला. मात्र हे नाते कंपनीच्या कामकाजात आम्ही दोघेही आड येवू देत नाही.
रिस्क टू रिवॉर्ड्स
सर्वसामान्य माणसाला आजही शेअर मार्केट, स्टॉक मार्केट याची काहीअंशी भीती वाटते. याचे कारण विचारता ते म्हणाले जीवन हे ‘रिस्क टू रिवॉर्ड्स’ असे आहे. जितकी जास्त गुंतवणूक तितकाच फायदा अधिक त्यामुळे थोडीफार रिस्क घेणे आवश्यक असते. भारत हा झपाटय़ाने प्रगती करत असून, लवकरच आर्थिकदृष्टय़ा महासत्ता होईल. जे लोक बँकेत पैसा ठेवतात त्यांनी आपली मानसिकता बदलायला हवी. कारण बँकेत ठेवणारा पैसा देशाच्या प्रगतीला साहाय्यभूत ठरत नाही. देशातील मोठय़ा कंपन्यांनी उद्योगामध्ये पैसा गुंतवायला हवा. त्यामुळे अनेकांना रोजगार मिळेल, त्यातून शेअर मार्केट विस्तारित होईल व तो पैसा देशासाठी वापरता येईल. पैसा मिळवणे ही एक गोष्ट आहे. पण तो हाती असणे त्यातून योग्यवेळी योग्य गोष्टी करणे आणि वेगळे कौशल्य निर्माण करणे ही दुसरी गोष्ट आहे. माझा कौशल्य निर्माण करण्यावर अधिक भर आहे.
स्टॉक मार्केट, शेअर मार्केट यांचे मुख्यालय मुंबईत आहे. पण आपण बेंगळूरमध्ये व्यवसाय का सुरू केला? या प्रश्नावर ते म्हणाले, आज कोणताही उद्योग हा तंत्रज्ञानावर आधारलेला आहे. पैशाचे व्यवहार कोठूनही हाताळता येतात. परंतु त्यासाठी तांत्रिक व्यासपीठ महत्त्वाचे आहे. आणि मुंबईशी तुलना करता बेंगळूर तंत्रज्ञानाच्यादृष्टीने अधिक योग्य आहे, असे मला वाटते. शिवाय पूर्वीपासूनच मी बेंगळूरला असल्याने येथेच कंपनी सुरू केली.
तरुणाई शेअर मार्केटींगकडे
झेरोदाने तरुणाईला अधिक आकृष्ट केले आहे. त्यामागचे कारण काय? या प्रश्नावर नितीन म्हणाले, आजची तरुणाई ही उत्पादन (प्रॉडक्ट) च्या दर्जावर अधिक भर देते. त्यांना नात्यापेक्षा व्यवसायाची प्रगती आणि वाढ महत्त्वाची वाटते. याचा अर्थ नात्याचे महत्त्व नाही असे नसते. पण नातेसंबंध आणि व्यवसाय हे दोन स्वतंत्र भाग आहेत, याची तरुणाईला जाणीव आहे. पैशाचे महत्त्व आजची तरुणाई पुरेपूर ओळखून आहे. म्हणून ती शेअर मार्केटींगकडे वळत आहे.
महिला उत्तम गुंतवणूकदार
शेअर मार्केटच्या व्यवसायात किंवा उद्योगात महिलांचा सहभाग कमी का? या प्रश्नाशी पूर्णपणे सहमत होत नितीन म्हणाले, पूर्वीपासूनच महिलांना आर्थिक व्यवहार कळत नाहीत, अशी मानसिकता रूजली आहे म्हणून महिलांचे आर्थिक व्यवहार पुरूषच पाहतात. तथापि माझ्या मते महिला या उत्तम गुंतवणूकदार आहेत. बचत आणि काटकसर दोन्ही त्या जाणतात. त्यामुळे कोणतीही असुरक्षितता न बाळगता त्यांनी वित्तीय क्षेत्रात यायला हवे आणि आपले आर्थिक व्यवहार आपणच करायला हवेत.
सर्वसामान्य भारतीयांना आर्थिक साक्षरतेचे महत्त्व पटावे यासाठी ‘झेरोदा’ कोणते उपक्रम राबवते? या प्रश्नावर तरुण गुंतवणूकदारांना आर्थिकदृष्टय़ा शिक्षित करण्यासाठी कंपनीने ‘व्हर्सिटी’ हे शिक्षक मॉडय़ूल सुरू केले आहे. ‘झेरोदा’ व्हर्सिटी ही कंपनी चालवते. व्हर्सिटी ही ओपन स्टॉक मार्केटबाबत व वित्तीय शिक्षण देणारी कंपनी आहे. त्याअंतर्गत सर्वांना आर्थिक साक्षरतेचे प्रशिक्षण दिले जाते. जवळजवळ 12 स्टार्टअपस् आम्ही तरुणांसाठी सुरू केले आहेत.
श्रीमंतांच्या यादीमध्ये आपल्या दोघांचा समावेश झाल्याबद्दल काय सांगाल, या प्रश्नावर खरे तर मला याचे फारसे अप्रुप वाटत नाही. विनाकारण आम्ही लक्षवेधी झालो की काय असे वाटते. कंपनीची पत आणि व्यवसाय पाहून हा क्रमांक दिला जातो. त्याचा निश्चितच आनंद आहे. परंतु अजूनही आम्हाला खूप पल्ला गाठावयाचा आहे, असे ते म्हणाले.
कोरोनाकाळात कंपनीची वाढ
कोरोनामुळे सर्व उद्योग व्यवसायांना झळ बसली. आपल्या व्यवसायालासुद्धा झळ लागली का? या प्रश्नावर मात्र कोरोनामुळे काही सकारात्मक गोष्टीही घडल्या. त्यामध्ये ऑनलाईन शिक्षण व ऑनलाईन मार्केटींग यांना उल्लेखनिय महत्त्व प्राप्त झाले. त्यामुळे या काळात आमचा व्यवसाय अधिक वाढला, असे नितीन कामत यांनी सांगितले.
चार दशलक्ष ग्राहक….
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत महत्त्वाची मानली जाणारी ही कंपनी ग्राहकांच्या प्रत्येक व्यवहारासाठी 20 रुपये दर आकारते. सुरुवातीला केवळ 10 हजार ग्राहक असणाऱया झेरोदाचे आज जगभरात चार दशलक्ष ग्राहक आहेत. नितीन कामत यांची मालमत्ता 1.2 अब्ज डॉलर्स आहे. तर नितीन व निखिल या दोघांची मालमत्ता 24 हजार कोटींची आहे.
मुलाखतीत….
नितीन-निखिल कामत श्रीमंतांच्या याद
उद्योग व्यवसायाची पत महत्त्वाची
वित्तीय क्षेत्रात नाते आणू नये
रिस्क टू रिवॉर्ड्स सूत्र अंमलात आणावे
शेअर मार्केटमध्ये पैसा खेळता हवा
तरुणाईला पैशाचे महत्त्व
महिला उत्तम गुंतवणूकदार