आनेवाडी टोलनाका राष्ट्रवादीकडे तर खेड शिवापूरचा सेनेकडे
प्रतिनिधी / सातारा, आनेवाडी
टोलनाक्यावरुन दोन्ही राजे भिडल्याचा आठवणी सातारकरांना चांगल्या ज्ञात आहेत. त्याच टोलनाक्याचे गुपचुप हस्तातंरण झाल्याची चर्चा एप्रिल फुलच्या निमित्ताने सकाळपासून सुरु होती. प्रत्यक्षात आनेवाडी टोलनाक्यावर रात्रीपासून मोठा पोलीस बंदोबस्त आहे. आनेवाडी टोलनाका आणि खेड शिवापूर टोलनाक्याचे व्यवस्थापन राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांचे निकटवर्तीय पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक सचिन दोडके यांच्याकडे गेला आहे. त्यांनी मीडियाशी तशा मुलाखतीही दिल्या असल्याचे वृत्त आहे. याबाबत टोलनाका व्यवस्थापनाशी फोनवरुन माहिती घेतली असता त्यांनी आम्हाला अजून अधिकृत पत्र नाही, असे सांगितले. परंतु शनिवार 3 रोजी टोलनाक्याचे हस्तांतरण होणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळत आहे.
आनेवाडी आणि पुणे येथील खेड शिवापूराचा टोलनाक्यावरील व्यवस्थापन हे खासदार उदयनराजे यांचे कट्टर समर्थक अशोक सावंत यांच्याकडे चालवण्यास होते. त्यांच्याकडून हा टोलनाका हस्तांतरण होण्याची 5 ऑक्टोबर 2017 ला पहिली प्रक्रिया सुरु झाली तेव्हा आनेवाडी टोलनाक्यावर दोन्ही राजे आमनेसामने आले होते. दोन्ही राजेंचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले होते. तेव्हा दोन्ही राजे ही राष्ट्रवादीकडे होते. आनेवाडी टोलनाक्यावर धक्काबुक्की पाठलाग अन् शुक्रवार पेठेतले नाटय़ आजही दोन्ही राजेंच्या कार्यकर्त्यांच्यासमोर ते चित्र उभे रहात आहे. ती घटना कोजागिरीच्या पौर्णिमेला घडली होती. कोजागिरीच्या पौर्णिमेनंतर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांची दिवाळी पोलीस ठाण्यात गेली होती. असा काहीसा टोलनाक्याच्या राडय़ाचा इतिहास आहे. असे असताना दोन्ही राजे सध्या भाजपामध्ये आहेत. तर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. महाविकास आघाडीमधील उपमुख्यमंत्री अजितदादा आणि खासदार उदयनराजे यांचे हाडवैर उभ्या महाराष्ट्राला चांगले ज्ञात आहे.
आनेवाडी आणि खेड शिवापुरच्या टोलनाक्याचे व्यवस्थापन 1 एप्रिलला बदलणार होते. खासदार उदयनराजे यांच्या समर्थकांकडून काढून घेवून ते महाविकास आघाडीचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांचे कट्टर समर्थक सचिन दोडके यांच्याकडे आल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. 3 एप्रिलला हे व्यवस्थापन देण्यात येणार आहे, असे समजते. शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश कोंडे यांचाही सहभाग असून त्यामध्ये असल्याचे समजते. त्यामुळे टोलनाक्यावर पुन्हा धुमशान होवू नये म्हणून दिवसभर पोलीस बंदोबस्त होता.
मी जानेवारीलाच स्वतःहून टोलनाका सोडला आहे
मीच स्वतः रिलायंन्स कंपनीला पत्र देवून जानेवारीमध्ये टोलनाका सोडलेला आहे. त्यामुळे जानेवारीपासून रिलायन्सच टोलचे व्यवस्थापन चालवत आहे. माझ्याकडून हस्तांतरणाबाबत आता काहीच प्रक्रिया उरली नाही.
अशोक सावंत, अशोका स्थापत्य वसुलीची रक्कम आम्ही गोळा करणार नाही
या टोलनाक्यांच्या माध्यमातून स्थानिक तरुणांना रोजगार मिळावा, यासाठी त्याचा उपयोग होईल. टोलवरील कर्मचारी पुरविण्याचे हे कंत्राट आहे. प्रत्यक्ष टोल वसुलीची रक्कम आम्ही गोळा करणार नाही. ही वसुलीची रक्कम बँकेकडे जमा होणार आहे, अशी प्रतिक्रिया नगरसेवक सचिन दोडके यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली आहे.
कडे अजून अधिकृत पत्रच नाही
टोलनाक्यावरील घडामोडीबाबत टोलनाक्यावर असलेल्या प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी म्हणून संकेत गांधी यांच्याशी संपर्क साधला असता हस्तांतरणाबाबत आमच्याकडे अधिकृत असे कोणतेच पत्र आले नाही. त्यामुळे आम्हाला त्याबाबत काहीच माहिती नाही. पोलीस बंदोबस्त टोलचे दर वाढवल्याने मागवला होता, असे त्यांनी सांगितले.
कोजागिरी पौर्णिमा अन् होळीची पोर्णिमा तब्बल पाच वर्षानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने खासदार उदयनराजेंच्या ताब्यातून टोलनाका काढून घेतला. त्यावेळीही खासदार उदयनराजे हे राष्ट्रवादीत असले तरीही राष्ट्रवादीमधीलच अंतर्गत दुफळीमुळे टोलनाक्यावर अन्य व्यवस्थापन आणण्याच्या प्रयत्नातूनच वाद निर्माण झाला होता. तो दिवस कोजगिरी पौर्णैमेचा होता. आता मात्र होळी पौर्णिमा नुकतीच होवून गेली आहे. उद्या रंगपंचमी आहे. त्यामध्ये टोलनाका हस्तांतरणाचा प्रक्रिया होवून राजकीय रंग आणखी भरणार की बेरंग करणार याचीच चर्चा जिह्यात सुरु झाली आहे.