कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरबीआय गव्हर्नरांचा दावा : कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी भारताची सकारात्मक वाटचाल
मुंबई / वृत्तसंस्था
कोरोनामुळे गेल्या शंभर वर्षांतील सर्वात वाईट आरोग्य आणि आर्थिक संकट सर्वांसमोर उभे राहिलेले आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी भारताकडून सकारात्मक प्रयत्न सुरु असून त्याला यश मिळत असल्याचा दावा आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शनिवारी येथे केला. स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे आयोजित परिषदेत बोलताना त्यांनी कोरोनाच्या संसर्गानंतर बदललेल्या परिस्थितीबाबत परखडपणे भाष्य केले.
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शनिवारी स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे आयोजित बँकिग अँड इकॉनॉमिक्स कॉन्क्लेव्हला संबोधित केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रथमच हा कार्यक्रम व्हर्च्युअल माध्यमातून सुरू झाला आहे. या परिषदेची थीम ‘बिझनेस आणि अर्थव्यवस्थेवर कोरोनाचा प्रभाव’ अशी आहे. या कार्यक्रमात अनेक अर्थतज्ञांनी सहभाग घेतला आहे. सध्या कोरोना विषाणू संसर्गामुळे देशाची आर्थिक स्थिती बिकट बनली आहे, अशा स्थितीमध्ये ही परिषद सुरू झाली आहे. दोन दिवस हा कार्यक्रम सुरु राहणार आहे.
‘कॉन्क्लेव्ह’अंतर्गत आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शनिवारी स्टेट बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष रजनीश कुमार यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. कोरोना विषाणूमुळे सध्या मागील 100 वर्षातील सर्वात वाईट आरोग्य आणि आर्थिक संकट उभे राहिलेले आहे. या संकटामुळे उत्पादन आणि नोकऱयांवर वाईट परिणाम झाला आहे. तसेच जगभरातील अर्थव्यवस्था आणि गुंतवणुकीवर थेट परिणाम केलेला आहे. भारतातील परिस्थितीही काही वेगळी नाही. सध्याच्या स्थितीमध्ये आर्थिक वृद्धी करणे सरकारची प्राथमिकता असल्याचे यावेळी शक्तिकांत दास म्हणाले.
उद्योग-कंपन्यांकडून सहकार्य
लॉकडाऊनवरील निर्बंध हटवल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा सामान्य स्थितीमध्ये परतत असल्याचे संकेत दिसत असल्याचे दास यांनी स्पष्ट केले. तसेच या संकटाच्या काळात भारतीय कंपन्या आणि उद्योगांनी चांगले काम केले आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने आर्थिक स्थिती सुरक्षित ठेवणे, सध्याच्या स्थितीमध्ये अर्थव्यवस्थेला मदत करण्यासाठी अनेक महत्त्वाची पावले उचलली असल्याचेही त्यांनी सांगितले.
रोजगारांवर परिणाम
आर्थिक संकटामुळे अनेक उद्योगांना याचा फटका बसला आहे. त्यामुळे साहजिकच रोजगारावर परिणाम झाले आहेत. नोकरीपासून दैनंदिन कामांवरही प्रभाव दिसून आला. तसेच जागतिक साखळी मूल्य आणि जगभरातील कामगारांवरही याचा मोठा परिणाम झाल्याचे दास म्हणाले. मात्र, हळूहळू परिस्थिती नियंत्रणात येईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.
रिझर्व्ह बँकेचाही हातभार
सर्वत्र आर्थिक परिस्थिती गंभीर असताना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहे. रिझर्व्ह बँकेने फेब्रुवारी 2019 पासून आतापर्यंत दरांमध्ये 115 बेसिस पॉईंट्सची कपात केली आहे. वृद्धीदरात झालेल्या घसरणीतून सावरण्यासाठी ही पावले उचलण्यात आली आहेत. याचा आर्थिक फटका मोठा असला तरी कठीण प्रसंगात असे निर्णय घेणे क्रमप्राप्त असल्याचा दावा त्यांनी केला.