बेळगाव :/ प्रतिनिधी
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभर लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे मालवाहतूक करणारी शहरातील हजारो वाहने जाग्यावरच थांबून आहेत. त्यामुळे वाहनचालकांना मोठा फटका सहन करावा लागत आहे. गेल्या 15 दिवसांपासून मालवाहतूक ठप्प झाल्याने वाहनधारकांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे वाहनांवर वाहनचालक म्हणून काम करणाऱया वाहनचालकांसह हमालांचा प्रश्न गंभीर बनत आहे.
कोरोनाच्या संकटामुळे संपूर्ण वाहतूक व्यवस्था बंद ठेवण्यात आली आहे. अनावश्यक वाहतूक व विनाकारण फिरणाऱयांवर पोलिसांचा कारवाई सपाटा सुरू आहे. पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला असून अनावश्यक वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. दरम्यान वाहतूक करण्यासाठी वाहनमालक व चालक तयार नसल्याने अत्यावश्यक वस्तुंच्या वाहतुकीवरही परिणाम होत आहे.
शहरात मालवाहतूक करणाऱया ट्रक व टॅम्पोची संख्या अधिक आहे. बेळगाव जुन्या पी. बी. रोडवर बेळगाव गुड्स टेम्पो ओनर्स असोसिएशनचे मालवाहू टेम्पो भाडय़ासाठी थांबत असतात. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून संपूर्ण मालवाहतूक बंद राहिल्याने वाहनधारक अडचणीत आले आहेत.
वाहनांचे विमा, टॅक्स भरणे मुश्कील : गंगाराम सावंत (अध्यक्ष बेळगाव गुड्स टेम्पो ओनर्स असोसिएशन)
स्मार्ट सिटीच्या विकासकामांमुळे रस्ते बंद होते. त्यामुळे धंद्यांवर मोठा परिणाम झाला होता. त्यातच आता कोरोनामुळे मालवाहतूक व्यवसाय संकटात आला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून वाहने थांबून असल्याने वाहनांचे विमा, टॅक्स भरणे मुश्कील बनले आहे. मालवाहतूक बंद असल्याने त्यावर अवलंबून असणारे मालक-चालक, हमाल यांना घरी बसावे लागले आहे. सध्या 15 दिवसांपासून वाहने बंद आहेत. मात्र लॉकडाऊनचा कालावधी वाढल्यास मोठा फटका बसणार आहे.