दिवाळी सणाच्या खरेदीकरिता नागरिकांची गर्दी वाढल्याने पार्किंग समस्या
प्रतिनिधी/ बेळगाव
वाढत्या वाहन संख्येमुळे पार्किंगची समस्या आता नेहमीची डोकेदुखी बनत चालली आहे. विविध रस्त्यांवर वाहने पार्क केली जात असल्याने वाहतूक कोंडीची समस्या मोठय़ा प्रमाणात भेडसावत आहे. पण दिवाळी सणाच्या खरेदीकरिता नागरिकांची गर्दी वाढल्याने शहरातील प्रत्येक रस्त्यावर पार्किंग करण्यात येत आहे. परिणामी पार्किंग आणि वाहतूक कोंडीची समस्या बाजारात निर्माण होते.
शहरात वाहनांची संख्या वाढल्याने समस्यांचा डोंगर वाढत चालला आहे. एरवी बाजारादिवशी शहरात वाहतूक कोंडी आणि पार्किंग समस्या निर्माण होत असते. मात्र प्रत्येक सणाला तालुका आणि जिल्हय़ातील नागरिक खरेदीकरिता बाजारपेठेत येत असतात. यामुळे सणाच्या कालावधीत पार्किंग आणि वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत आहे. कोरोनामुळे मार्च महिन्यापासून कोरोना विषाणूंचा प्रसार आणि लॉकडाऊनमुळे नागरिकांना खरेदीकरिता बाहेर पडता आले नाही. आठ महिन्यांच्या कालावधीतील प्रत्येक सणाला कोरोनाच्या नियमांचे ग्रहण लागल्याने नागरिकांना खरेदी करता आली नाही. पण दिवाळी सण वर्षातील मोठा सण म्हणून ओळखला जातो. त्यामुळे दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर खरेदीकरिता नागरिकांची गर्दी वाढत आहे. यामुळे गणपत गल्ली, खडे बाजार, मारुती गल्ली, रामदेव गल्ली, काकतीवेस, समादेवी गल्ली, कॉलेज रोड, कचेरी गल्ली, रिसालदार गल्ली परिसरात गर्दी होत आहे.तसेच कॉलेज रोड, धर्मवीर चौक ते संचयनी चौक अशा मुख्य रस्त्यावर चारचाकी वाहने पार्क करण्यात येत असल्याने वाहनाची गर्दी होत आहे.
खरेदीकरिता येणारे नागरिक दुचाकी आणि चार चाकी घेऊन येत असल्याने पार्किंगची समस्या भेडसावत आहे. त्यामुळे दुचाकींसह चार चाकी वाहने रस्त्यांवर पार्क करण्यात येत असल्याने प्रत्येक रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असून वाहनधारकांना अडकून राहावे लागले. दिवाळी सण आठ दिवसांवर येऊन ठेपला असल्याने बलिप्रतिपदेपर्यंत बाजारपेठेत गर्दी असते. शहरात असलेले मनपाचे आणि खासगी पार्किंग तळ अपुरे पडत आहेत. त्यामुळे वाहनधारक जागा मिळेल त्या ठिकाणी वाहने पार्क करून खरेदीकरिता जात आहेत. विशेषत: परराज्यांमधून आलेल्या नागरिकांना पार्किंगबाबत माहिती नसल्याने रस्त्याशेजारी वाहने पार्क करण्याचे प्रकार घडत आहे. त्यामुळे वाहन कोंडीची समस्या निर्माण होते. मारुती गल्ली परिसरात वाहने पार्क केल्यानंतर फेरीवाले हातगाडय़ा लावत आहेत. अशातच प्रवाशी रिक्षावाले मारुती गल्लीमध्ये प्रवाशांची प्रतीक्षा करीत ठाण मांडत आहेत. यामुळे पादचाऱयांना ये-जा करण्यास अडचण होत आहे. काही फेरीवाल्यांनी रस्त्यावर पुढे येऊन व्यवसाय थाटला असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. यामुळे या परिसरात होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना हाती घेण्याची मागणी करण्यात येत आहे. वाहतूक केंडी टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्याची मागणी होत आहे. हेल्मेट सक्तीच्या नावाखाली विविध चौकात थांबून वसुली करणाऱया रहदारी पोलिसांची नियुक्ती बाजारपेठेत करण्याची मागणी होत आहे.
पार्किगकरिता जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनाची आहे. पण याकडे दुर्लक्ष झाले असल्याने पार्किंगची समस्या निर्माण होत आहे. उपलब्ध असलेल्या पार्किंगच्या जागेत व्यवस्थित पार्किंग करण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्याची गरज आहे. पण रस्त्याशेजारी पार्किंग करण्यात येणारी दुचाकी वाहने उचलून नेण्याची कारवाई रहदारी पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे. पण चार चाकी वाहनेही मोठय़ा प्रमाणात पार्क करण्यात येत आहेत. मात्र, त्या वाहनधारकांवर कोणतीच कारवाई केली जात नसल्याची तक्रार दुचाकी वाहनधारक करीत आहेत.