रवी नाईक यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
प्रतिनिधी / फोंडा
राज्य सरकारने शाळा, महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी प्राचार्य, पालक शिक्षक समिती व शाळा व्यवस्थापनाला विश्वासात घेऊनच तसा निर्णय घ्यावा. तसेच शिक्षण तज्ञांशी या विषयावर सल्ला मसलत करावी, अशी मागणी फोंडय़ाचे आमदार व माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांनी केली आहे. यासंबंधीचे लेखी पत्र मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पाठविल्याची माहिती फोंडा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी दिली.
सध्या गोव्यात कोरोनाचा प्रभाव वाढत आहे. त्यामुळे सरकारने शाळा, महाविद्यालये तसेच इतर शैक्षणिक संस्था सुरु करण्याची घाई करू नये, अशी सूचना रवी नाईक यांनी केली आहे. शाळा, महाविद्यालये सुरु केल्यास विद्यार्थ्यांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवणे कठीण होईल. त्यासाठी आधी विद्यार्थ्यांच्या आरोग्य सुरक्षेसंबंधी ठोस उपाययोजना आखाव्या लागतील. सरकारने शिक्षण व आरोग्य क्षेत्रातील अनुभवी व तज्ञ लोकांची समिती स्थापन करून त्यांच्याशी याविषयावर सविस्तर चर्चा करूनच योग्य तो निर्णय घ्यावा. सध्या शिक्षण क्षेत्रात ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देण्याची सोय करण्यात आलेली आहे. गोव्यातील अनेक ग्रामीण भागात नेटवर्कची समस्या आहे. त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेताना विविध अडचणी येत आहेत. ऑनलाईन शिक्षण पद्धत हा सध्या तरी यशस्वी तोडगा होऊ शकत नाही, त्यांनी सांगितले.
कोरोनाबाधीचा वाढता आकडा चिंताजनक
राज्यात कोरोना बाधीत रुग्णांचा आकडा वाढत असून फोंडा, सत्तरी, सांगे या तालुक्य़ातील ग्रामीण भागातही रुग्ण आढळू लागले आहेत. त्यामुळे आता सरकारी यंत्रणाबरोबरच नागरिकांना स्वतः अधिक खबरदारी घ्यावी लागेल. संसर्ग वाढणार नाही व त्याचा सामाजिक प्रसार होणार नाही यासाठी अधिक दक्ष राहून काळजी घ्यावी लागणार आहे. आत्तापर्यंत ज्या भागात कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले आहेत तेथील परिस्थिती लक्षात घेऊन आवश्यकता भासल्यास तेवढा भाग लॉकडाऊन करावा. शिवाय परराज्यातून व परदेशातून येणाऱया लोकांची कसून तपासणी करण्याची मागणी रवी नाईक यांनी केली आहे.