लॉकडाऊनमुळे जनतेच्या होणाऱया गैरसोयीवर पालकमंत्र्यांकडून तोडगा : ऑनलाईन सुविधांचे प्रशासनाला आदेश
चार दिवसांत दुसरा ऑक्सिजन प्लांट!
एक लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण!
प्रतिनिधी / ओरोस:
कोविड पार्श्वभूमीवर बंद असलेल्या शासकीय कार्यालयांचे व्यवहार ऑनलाईन पद्धतीने करून दिले जाणार आहेत. तर जिल्हांतर्गत प्रवासासाठीच्या पासाबद्दलचा निर्णय जिल्हय़ाच्या परिस्थितीनुसार जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
जिल्हय़ाची कोविड स्थिती आणि उपाययोजना याबाबतची माहिती पालकमंत्र्यांनी ‘झूम ऍप’द्वारे घेतलेल्या ऑनलाईन पत्रकार परिषदेत दिली. कोविड रुग्णांची संख्या वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून शासनाने कर्मचारी उपस्थितीवर मर्यादा आणल्या आहेत. तर काही कार्यालये बंद आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांची कामे थांबू नयेत, यासाठी त्यांना ऑनलाईन सुविधा देण्यात येणार असल्याचे उदय सामंत यांनी स्पष्ट केले.
जिल्हांतर्गत प्रवासासाठीही पास आवश्यक
जिल्हय़ात येणाऱया नागरिकांसाठी ई-पास आवश्यक असल्याचे जाहीर करताना जिल्हांतर्गत प्रवासासाठी सुद्धा पास आवश्यक असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. याबाबत पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले असता जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना याबाबत निर्णय घेण्याचे आदेश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान जिल्हय़ाबाहेरून येणाऱयांसाठी जास्तीत जास्त 72 तास मर्यादित कोरोना चाचणी प्रमाणपत्र असणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
चार दिवसांत दुसरा ऑक्सिजन प्लांट
जिल्हय़ात दुसरा ऑक्सिजन प्लांट बसविण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी लागणारी मशिनरी गुजरातपर्यंत पोहोचली आहे. पुढील दोन दिवसांत ती सिंधुदुर्गात दाखल होईल. त्यानंतर पुढील चार ते पाच दिवसात दुसरा ऑक्सिजन प्लांट जिल्हय़ात कार्यान्वित होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी येथेही ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी प्रयत्न सुरू असून जिल्हा नियोजनकडून पैसे वर्ग करण्यात आले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्हय़ात आत्ता 52 व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. आणखी दहा व्हेंटिलेटर नव्याने घेतले जाणार आहेत. त्यासाठी जिल्हा नियोजनमधून पैसे दिले जाणार असल्याचे पालकमंत्री म्हणाले.
एक लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण
जिल्हय़ात लसीकरण मोहीम सुरू झाल्यानंतर आतापर्यंत 1 लाख 290 नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. 82 हजार 400 लोकांना पहिल्या टप्प्यातील डोस देण्यात आला आहे, तर 16,290 नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. रेमडेसिविर इंजेक्शन आवश्यकतेनुसार घेतले जात आहे. कमतरता भासणार नाही याची दक्षता घेतली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
चेकपोस्ट, रेल्वेस्थानकांवर आरोग्य पथके
सहा चेक पोस्ट आणि सहा रेल्वे स्थानकांवर आरोग्य पथके तैनात ठेवण्यात आली आहेत. सद्यस्थितीत अंटिजेन किटचा पुरवठा कमी आहे. त्यामुळे जिल्हय़ात दाखल होणाऱयांपैकी लक्षणे असणाऱयांची तपासणी होत आहे. मात्र 25 एप्रिलपासून सरसकट सर्वच प्रवाशांची टेस्ट केली जाणार आहे. टेस्ट झाल्यावर निगेटिव्ह असणाऱयांनाही योग्य ते प्रमाणपत्र दिले जाणार आहे. जिल्हय़ातील विविध कंपन्यांमधून काम करणाऱया कामगारांची आरटीपीसीआर चाचणी प्रशासनाकडून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे ते म्हणाले.
होमक्वारंटाईन रुग्णांना इशारा
होमक्वारंटाईन शिक्का असलेल्या रुग्णांनी आपल्याला आता पाच, सात अथवा दहा दिवस झाले म्हणून स्वत:च्या मर्जीने बाहेर फिरू नये. आरोग्य यंत्रणेच्या सल्ल्यानेच निर्णय घ्यावा. अन्यथा अशा व्यक्ती फिरताना आढळल्यास त्यांना पकडून जबरदस्ती ऍडमिट केले जाईल आणि 14 दिवसांच्या कालावधीनंतर कोविडअंतर्गत कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.
ग्राम कृती दलातील सरपंचांना देण्यात आलेले विमा कवच केंद्र सरकारने थांबवले आहे. मात्र ते पूर्ववत करण्याबाबत चर्चा सुरू आहे. सर्व सरपंच आणि ग्राम कृती दलांनी सुरुवातीप्रमाणेच सहकार्य करावे, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले.