प्रतिनिधी/ सातारा
हद्दवाढ झाल्याने शाहूपुरी ग्रामपंचायत बरखास्त झाली. आता सातारा पालिकेकडून हद्दवाढीची प्रक्रियाच फक्त सुरु आहे. मात्र, ग्रामपंचायत अस्तित्वात नसल्याने शाहूपुरीकरांना मूलभूत सुविधा मिळणेही दुरापास्त झालेय. नागरिकांच्या याबाबतच्या तक्रारी शाहूपुरी विकास आघाडीचे नेते भारत भोसले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या निदर्शनास आणून दिल्या. त्या तातडीने सोडवण्याचे आश्वासन बापट यांनी यावेळी दिले आहे.
हद्दवाढीनंतरच्या कालावधीत शाहूपुरी येथील नागरिकांना बंद स्ट्रीट लाईट, परिसर स्वच्छता, विविध विकासकामांसाठी लागणारे तांत्रिक दाखले, कर्मचाऱयांच्या मासिक वेतनातील अनियमितता, आरोग्य सुविधा, गटर्स दुरुस्ती, नागरिकांना लागणारे विविध प्रकारचे दाखले, घंटागाडी नियोजन यासाठी शाहूपुरी ग्रामविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने सोमवारी बापट यांना निवेदन दिले.
हद्दवाढीनंतर मागील काही महिन्यांत नागरिकांची नागरी सुविधांसंदर्भात होत असलेली गैरसोय नागरिकांना हद्दवाढीपेक्षा पूर्वीचीच व्यवस्था बरी अशी म्हणण्याची वेळ आली असल्याचे सांगून आपली नाराजी व्यक्त केली. यावेळी नगरसेवक अविनाश कदम तसेच राजेंद्रकुमार मोहिते, नवनाथ जाधव, सुहास वहाळकर, निलम देशमुख, माधवी शेटे, विकास देशमुख, सुरेश शेटे यांचा समावेश होता.