प्रतिनिधी / कोल्हापूर :
कागल येथील छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याला जर्मनी येथील टीयुव्ही कंपनीकडून पर्यावरण व्यवस्थापनातील आयएसओ 14001:2015 आणि गुणवत्ता व्यवस्थापनातील 45001:2018 ही दोन मानांकने मिळाली आहेत. अशा स्वरुपाची मानांकने मिळविणारा शाहू देशातील पहिला साखर कारखाना ठरला आहे. शाहूच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. कारखान्याला आजवर राज्य व राष्ट्रीय पातळीवरील 62 पुरस्कार मिळाले आहेत. अशी माहिती चेअरमन समरजित घाटगे, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन अमरसिंह घोरपडे उपस्थित होते.
कार्यकारी संचालक राजेंद्र चव्हाण म्हणाले, आयएसओ 14001:2015 हे मानांकन पर्यावरण व्यवस्थापन कार्यपध्दतीसाठी आहे. कारखान्यामध्ये चालणाऱया प्रक्रियांचा अभ्यास करून यामधून निर्माण होणाऱया प्रदुषकांचे प्रमाण कमी होण्यास मदत या कार्यपध्दतीमुळे होते. तसेच प्रक्रियेसाठी पाणी, वीज आणि वाफ यांचा काळजीपूर्वक व योग्य प्रमाणात वापर करणेसाठी होतो. व्यावसाईक आरोग्य आणि सुरक्षा व्यवस्थापन कार्यप्रणालीसाठीचे 45001:2018 हे मानांकन मिळाले आहे. कारखान्यामध्ये काम करत असताना कामगारांसह इतरांना इजा व अपघात होऊ नये यासाठी धोक्याची संभाव्यता व त्यांची पूर्वतयारी, योग्य सुरक्षित साधनांचा पुरवठा व वापर केला जातो. कर्मचाऱयांना सुरक्षिततेबद्दलचे प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी होते.
समरजीत घाटगे म्हणाले, आतापर्यंत शाहू कारखान्याचा 62 पुरस्कारांनी गौरव झालेला आहे. 9001:2015 ( गुणवत्ता व्यवस्थापन कार्यप्रणाली ) ही जर्मनीची आयएसओ सर्टिफिकेशन मधील जगातील अग्रगण्य कंपनी आहे. त्यांचेकडून आयएसओ 9001:2000 मानांकन 2002 साली मिळाले होते. व त्याची पुढील आवृत्ती 9001:2015 मानांकन 2018 ला मिळाले. कामामधील गुणवत्तेसाठी हे मानांकन आहे. या कार्यप्रणालीमुळे काम करण्याच्या पध्दतीमध्ये अमुलाग्र बदल होतो, कामामध्ये सुलभता येते, कामामधील अचुकता, सातत्य आणि सुधारणा याद्वारे गुणवत्तापूर्ण उत्पादने तयार होण्यास मदत होते. अशा गुणवत्तापूर्ण उत्पादनांमुळे ग्राहकांचा विश्वास वाढण्यास मदत होते.
22000 ( अन्न सुरक्षा व्यवस्थापन कार्यपध्दती ) ही अन्न सुरक्षेमधील उच्च प्रतीची कार्यपध्दती आहे. यामध्ये साखरेच्या गुणवत्तापूर्ण निर्मितीबरोबरच साखर उत्पादन करण्याच्या ठिकाणी योग्य ती स्वच्छता राखणे आणि साखर हाताळणी करताना दुषीत होऊ नये यासाठीची व्यवस्थापन कार्यप्रणाली आहे. कारखान्यात तयार झालेली साखर उत्पादने अरब, ज्यू देशामध्येविक्रीसाठी आवश्यक असल्याचे प्रमाणपत्रही मिळालेले आहे. असे घाटगे यांनी सांगितले.
शेतकऱयांच्या ऋणातून उतराई होणे शक्य नाही
काळाची गरज लक्षात घेऊन सर्वात आधी योग्य तो बदल करण्याची ‘शाहू’ व्यवस्थापनाने परंपरा कायम आमच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन शेतकऱयांनी कारखाना उभारणीस हातभार लावला. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय पातळीवर शाहू साखर ब्रँड पोहचला. शेतकऱयांच्या ऋणातून कधीही उतराई होता येणार नाही. समरजीत घाटगे, प्रमुख शाहू उद्योग समुह