म्हसवड / प्रतिनिधी :
एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी कथानकासारखी घटना माण तालुक्यातील शिंदी बुद्रुक येथील शेतकऱ्यांसोबत मागील काही वर्षांपासून चालू आहे. त्यामुळे येथील शेतऱ्यांना ‘आमची जमीन गेली चोरीला’ असे म्हणण्याखेरीज दुसरा पर्याय राहिला नसल्याचे सांगण्यात येते.
शिंदी बु, येथील गट नंबर 600 हा 36 एकर क्षेत्र असणारा गट आहे. या क्षेत्रामध्ये जवळपास 40 शेतकरी सहहिस्सेदार आहेत. यातील काही क्षेत्र सन 2000 साली तुपेवाडी लघु पाटबंधारे योजनेकामी अधिग्रहित झाले हे अधिग्रहण होऊन 20 वर्षे लोटली तरीही आजअखेर शासनाने अधिग्रहित जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना दिला नाही. सुरवातीस मा. विशेष भूसंपादन उपजिल्हाधिकारी नंबर 12 यांचे मार्गदर्शनाखाली लघुपाठबंधारे योजना अस्तित्वात आली. कालांतराने याचे सर्व अधिकार प्रशासकीय कारणास्तव मा. उपविभागीय अधिकारी दहिवडी यांचेकडे देण्यात आले, मोबदला व गाळपेर हक्क मिळावा म्हणून येथील शेतकऱयांनी अनेक वेळा भूसंपादन विभाग सातारा व उपविभागीय अधिकारी दहिवडी यांचेकडे निवेदने, आंदोलने मोर्चे काढले परंतु या संबंधित विभागाने अलपभूधारक शिंदीकरांच्या या मागणीकडे दुर्लक्षच करणे पसंत केले आहे.
दरम्यान, याच गट नंबर 600 मध्ये शिंदी येथीलच काही धनदांडग्या लोकांनी तत्कालीन महसुली अधिकारी कर्मचारी यांना हाताशी धरून काही 7/12 सदरी अनेक बोगस नोंदी करून घेतल्या व वाढीव क्षेत्रात जबरदस्तीने अतिक्रमण केले. सर्वसामान्य शेतकऱ्यांनी यांचा कायम विरोध केला पण त्यांचे प्रयत्न अपुरे पडत आहे. आज रोजी सर्व वंचित खातेदारांची 7/12 उताऱ्यावर नोंद आहे, पण कब्जा वहिवाट नाही. त्यामुळे 7/12 वर नोंद असणारी जमीन चोरीला गेली असल्याचा प्रकार घडला. या संबंधित अतिक्रमण प्रकरणी मंत्रालय स्तरापर्यंत येथील नागरिकांनी निवेदने पाठवून आवाज उठविला पण वरिष्ठ अधिकाऱयांनी हे प्रकरण मा. जिल्हाधिकारी सो सातारा यांचेकडे सप्टेंबर 2020 मध्ये पाठवले व अतिक्रमण संबधी स्पष्ट अहवाल मागवला होता.
पर्यायाने चौकशी कार्यान्वयीत होऊन सुद्धा आज अखेर प्रशासनाचा कोणताही कर्मचारी अधिकारी या अतिक्रमणाचे अनुषंगाने स्थळ पाहणी व इतर कायदेशीर बाबांची पूर्तता करणेसाठी आले नाहीत. त्यामुळे अतिक्रमण धारकांची चलती चालू आह. त्याचबरोबर पोकळ नोंदी करणारे तत्कालीन तलाठी यांचेवर कारवाई करणेकामी महसूल प्रशासनास सर्व योग्य ते पुरावे येथील शेतकऱयांनी सादर केले आहेत. संबंधित गावकामगार तलाठी हे जिल्हा बदली करून दुसऱया जिह्यात रुजू झाले आहेत. याप्रकणी त्यांना 6 महिन्यापूर्वी फक्त नोटीस बजावली असून, संबधीतावर या गैरप्रकाराबद्दल प्रचलित शासन नियमानुसार प्रशासन कारवाई करणार का, हा प्रश्न अनुत्तरित आहे.
त्यामुळे एकीकडे अधिग्रहित जमीनीचा मोबदला आणि दुसरीकडे जमिनीचा हक्क हा शिंदीकर नागरिकांचा प्रश्न प्रशासन नक्की कधी सोडवेल? या कडे सर्वांचे लक्ष लागले अन्यथा 7/12 वरती फक्त नावापुरती जमीन नोंद असून प्रत्यक्षात मात्र जमीन चोरीला गेल्याची तक्रार करण्याची वेळ शिंदी बुद्रुक येथील खातेदारांवर आली आहे.