प्रतिनिधी/बागणी
शिगाव ता. वाळवा येथील एसटी स्टँड ते पुलापर्यंताच्या रस्त्याची उंची खूप वाढीव धरल्याने भविष्यात छोट्या पुराने सुध्दा गावातील घरे लवकर बाधित होण्याची शक्यता आहे. तसेच यावर्षी सुरक्षित राहिलेली घरे देखील भविष्यात बाधित होऊन मोठ्या अडचणीला गावाला तोंड द्यावे लागणार आहे. टोप- दिघंची या रस्त्याचे काम काही ठिकाणी सुसाट तर काही ठिकाणी कासव गतीने सुरू आहे. शिगाव पुलाच्या बाजूस तीन ते चार फुटाणे वाढीव भर टाकून काम सुरू आहे. भादोले साईटला देखील पाच ते सहा फूट रस्त्याची उंची वाढवली असल्याने. पूर काळात शिगाव सह अन्य मागील गावांना मोठा पुराचा फटका बसला आहे. लाखो हेक्टर शेती पाण्याखाली जाऊन कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
सध्या शिगाव येथे सुरू असलेल्या या रस्त्याची उंची कमी केली तर हे सगळे संभाव्य धोके टळू शकतात. ते टाळण्यासाठी, ग्रामस्थांच्या मागणीला बांधकाम विभागाने वाटाण्याच्या अक्षदा दिल्या आहेत. ग्रामस्थांच्या भावनांचा, भीतीचा, सुरक्षिततेचा विचार न करता काम सूरु ठेवले आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने सर्व विभागांना लेखी तक्रार कळवून देखील कोणी दखल घेण्यास तयार नाही. त्यामुळे लोकनियुक्त सरपंच उत्तम गावडे यांनी त्यांच्या सहकार्यांच्या सोबत १ मार्च पासून मारुती मंदिर शिगाव येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. यामध्ये उपसरपंच जितेंद्र पाटील, निवास पाटील, दिग्विजय पाटील, प्रदीप पाटील, शाहूराजे चव्हाण यांच्यासह शेकडो युवक, ग्रामस्थ त्यांच्या सोबत मंदिरात बसले आहेत. उपअभियंता सुभाष पाटील यांनी भेट देऊन रस्त्याला फक्त पाईप घालून देता येतील असे सुचवले आहे.