बाबासाहेब पुरंदरे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
पुणे / प्रतिनिधी
आपल्या अमोघ वाणी व ओजस्वी लेखणीतून शिवरायांचा ‘तेजस्वी’ इतिहास जिवंत करणाऱया आणि ‘शिवचरित्र’ सातासमुद्रापार नेणाऱया पद्मविभूषण, महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे पुण्यात निधन झाले. त्यांनी नुकतेच शंभरीत पदार्पण केले होते. त्यांच्या पश्चत मुलगी माधुरे, मुले अमृत व प्रसाद असा परिवार आहे. बाबासाहेबांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात व शोकाकुल वातावरणात येथील वैकुंठ स्मशानभूमीतील विद्युतदाहिनीत सोमवारी दुपारी एकच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हजारो शिवप्रेमींनी साश्रू नयनांनी या जाणत्या शिवचरित्रकाराला अखेरचा मुजरा केला.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती मागील काही दिवसांपासून ठीक नव्हती. त्यातच घरात पडून त्यांच्या डोक्याला इजा झाल्याने त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असतानाच त्यांना न्यूमोनिया झाल्याचे निदान झाले. यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास त्यांचे पार्थिव पर्वती पायथा येथील पुरंदरे वाडय़ात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. तेथे केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक, खासदार उदयनराजे भोसले, सुप्रिया सुळे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱहे, आमदार मुक्ता टिळक, महापौर मुरलीधर मोहोळ, संस्कृतचे गाढे अभ्यासक पं. वसंतराव गाडगीळ, ‘तरुण भारत’चे समूह प्रमुख किरण ठाकुर, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, इतिहासतज्ञ पाडुरंग बलकवडे, गजानन मेहेंदळे ‘जडणघडण’चे संपादक डॉ. सागर देशपांडे यांच्यासह अंकुश काकडे, प्रसेनजीत फडणवीस, उल्हास पवार, राहुल सोलापूरकर, सुधीर गाडगीळ, आनंद माडगूळकर, डॉ. सतीश देसाई, पराग ठाकूर, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, तेजस्विनी पंडित, शैलेश टिळक आदींनी बाबासाहेबांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.
शिवशाहिरांना बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना
अकराच्या सुमारास बाबासाहेबांचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमी येथे आणण्यात आले. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार गिरीश बापट, विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पिंपरी-चिंचवडच्या महापौर उषा ढोरे तसेच सांस्कृतिक विभागाच्या वतीने पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. त्यानंतर महिला जवानांकडून बंदुकीच्या तीन फैरी झाडून पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना मानवंदना देण्यात आली. बाबासाहेबांचे पुत्र प्रसाद पुरंदरे, अमृत पुरंदरे, कन्या माधुरी पुरंदरे यांच्यासह साहित्य, सांस्कृतिकसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी यावेळी अंतिम दर्शन घेतले.
हजारोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार
आपल्या या लाडक्या शिवशाहिराला अखेरचा निरोप देण्यासाठी हजारो नागरिक व शिवप्रेमींनी या परिसरात मोठी गर्दी केली होती. हजारोंच्या उपस्थितीतच दुपारी एकच्या सुमारास विद्युतदाहिनीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अनेक हृद्य आठवणी जागवत साश्रू नयनांनीच या महाराष्ट्र भूषणास शिवप्रेमींनी अखेरचा मुजरा केला.
सीमावासीयांचा आधारवड गमावला, किरण ठाकुर यांची शिवशाहिरांना श्रद्धांजली
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे बेळगाव व बेळगावकरांवर विशेष प्रेम होते. त्यांच्या निधनाने सीमावासीयांच्या पाठीशी कायम ठामपणे उभे राहणारा आधारवड गमावला. आमच्याशी त्यांचे अनोखे ऋणानुबंध होते, लोभ होता. सीमावासीयांवर जो अन्याय झाला, त्याविषयी त्यांना दुःख वाटे. हे दुःख ते नेहमी व्यक्त करीत, बोलून दाखवत, असल्याची भावना ‘तरुण भारत’चे समूह संपादक किरण ठाकुर यांनी व्यक्त केली. बाबासाहेबांच्या पाच व्याख्यानमाला बेळगावात झाल्या. त्यांच्या व्याख्यानांना मिळालेला प्रतिसाद अभूतपूर्व असाच होता. त्यानंतर ‘जाणता राजा’चेही बेळगावात प्रयोग झाले. हे 23 प्रयोगही ‘न भूतो न भविष्यती’ असेच होते, अशा शब्दांत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.