प्रतिनिधी / मुंबई
राममंदिर जन्मस्थळासाठी बाबरी मशिद उद्ध्वस्त करण्यासाठी एकत्र लढलेले शिवसेना-भाजप कार्यकर्ते आता राममंदिर निर्माणाच्या घोटाळ्याच्या आरोपावरून एकमेकांना भिडल्याने तुफान राडा झाला. दोन्ही बाजूनीही एकमेकांना मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
अयोध्येतील श्री राम मंदिर बांधण्यासाठी भूसंपादनाबाबत खोटे आणि बनावट आरोप केल्याचा दावा करत मुंबई भाजप युवा मोर्चाने अध्यक्ष तेजिंदरसिंग तिवाना यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेविरोधात थेट सेनाभवनावर फटकार मोर्चा काढला. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेना आमदार सदा सरवणकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकही सेनाभवन परिसरात मोठÎा संख्येने दाखल झाले. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. तरीही दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. त्यांतून एकमेकांना मारहाणही झाली.
तेजिंदरसिंग तिवाना यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे कार्यकर्ते शिवसेना भवनापासून काही अंतरावर असतानाच पोलिसांनी त्यांना अडवले. त्याचवेळी शिवसेनेचे कार्यकर्तेही चाल करून गेले. त्यातून दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले आणि हाणामारी झाली. भाजपच्या युवा मोर्चाचा मोर्चा शिवसेना भवनावर येणार असल्याची कुणकुण लागताच शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांच्यासह शेकडो शिवसैनिक जशास तसे उत्तर देण्याच्या इराद्यानेच शिवसेना भवनासमोर जमले होते. त्यामुळे दोन्ही पक्षात मोठी धुमश्चक्री उडण्याची चिन्हे दिसत होती. त्यामुळे शिवसेना भवनासमोर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जवांनानाही या ठिकाणी तैनात करण्यात आले होते. मात्र दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले आणि राडा झालाच.
`सोनिया सेना हाय हाय’
भाजपचे कार्यकर्ते घोषणा देतच राजा-राणी चौकात आले. यावेळी `सोनिया सेना हाय हाय’च्या घोषणा देत भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. शिवसेना भवनापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर हा मोर्चा येताच पोलिसांनी हा मोर्चा अडवला. त्यामुळे आंदोलक अधिकच आक्रमक झाल्याने पोलिसांनी या आंदोलकांची धरपकड करून त्यांना व्हॅनमध्ये कोंबले.
शिवसैनिकांकडून पाठलाग
दरम्यान, पोलिसांची व्हॅन या आंदोलकांना घेऊन शिवाजी पार्ककडे निघाली असतानाच शिवसैनिक व्हॅनच्या दिशेने धावले. मात्र, व्हॅन सुसाट गेल्याने भाजप कार्यकर्ते शिवसैनिकांच्या हाती लागले नाहीत.
शिवसैनिकांचीही धरपकड
दरम्यान, मोर्चा संपला असे वाटत असतानाच अचानक शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आले. शिवसैनिकांनी भाजपच्या काही कार्यकर्त्यांना मारहाण केली. काहींचे कपडेही फाटले. पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी काही शिवसैनिकांची धरपकडही सुरू केली.
मुंबईची कायदा-सुव्यवस्था धोक्यात ः दरेकर
उद्धव ठाकरे हे केवळ पक्षाचे अध्यक्ष नाहीत, तर राज्याचे मुख्यमंत्री आहेत. लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. पोलिसांच्या उपस्थितीत सरकार आमचे आहे आम्ही वाटेल ती दादागिरी करु, अशी भूमिका असेल तर ती खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा विधान परिषद विरोधीपक्षनेते प्रविण दरकेर यांनी दिला आहे. आंदोलकांच्या अंगावर जाणार ,त्यांना मारहाण करणार, धाक दपटशाह दाखवणार, अशाने मुंबईची कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते, असे प्रविण दरेकर म्हणाले.
महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून शिवसेना ज्या पद्धतीने पोलिसांना समोर ठेवून गुंडागर्दी, दहशतवाद, मारहाण करण्याचा प्रयत्न करतेय, ते दुर्दैवी आहे. सत्तेचे कळस घेऊन अशाप्रकारच्या गोष्टी महाराष्ट्रात कधीच झाल्या नाहीत. अशा प्रकारचा संघर्ष उभा राहिला तर त्याला वेगळे वळण मिळेल. पोलिसांनी नियंत्रण करायला हवे. पण सरकार आमचे आहे, असे म्हणून पोलिसांसमोर वाटेत ती दादागिरी करणं चुकीचं आहे आणि ते खपवून घेणार नाही, असे दरेकर म्हणाले.
क्रियेला प्रतिक्रिया असते ः अरविंद सावंत
ज्यांना कायदा-सुव्यवस्था माहिती आहे त्यांनीच कायदा-सुव्यवस्था का बिघडवायची? हा विषय इतका जोरात गाजतोय, तर त्याची चौकशी व्हावी, इतकीच मागणी होती. यात दुखावण्यासारखं काय आहे? प्रत्येक गोष्टीवर स्टंटबाजी का करायची? क्रियेला-प्रतिक्रिया असतात. प्रत्येक प्रतिक्रिया संयमी नसतात. चौकशीला घाबरायचे कशाला, असे शिवसेना खासदार अरविंद सावंत म्हणाले.
हिंदूंच्या श्रद्धांचा अपमान
अयोध्येत श्री राम मंदिर बांधण्यासाठी भूसंपादनाबाबत खोटे आणि बनावट आरोप करून शिवसेनेने हिंदू धर्म, हिंदू धार्मिक स्थळ आणि हिंदूंच्या श्रद्धा आणि आस्था यांचा अपमान केला आहे, असे म्हणत भारतीय जनता युवा मोर्चा मुंबईतर्फे शिवसेनेच्या या क्षुल्लक राजकीय षडयंत्राविरोधात शिवसेना भवनावर “फटकार मोर्चा” काढला.
ट्रस्टने खुलासा करावा
राम मंदिरासाठी जगभरातून शेकडो कोटींचा निधी येत आहे. प्रभू रामचंद्राच्या नावाने एकही घोटाळा व्हायला नको. श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टमध्ये भाजपशी संबंधित सदस्य आहेत. शिवसेनेचा एकही सदस्य नाही. रामभक्तांच्या श्रद्धेला तडा जाईल असे काही घडू नये ही अपेक्षा असतानाच जमीन व्यवहाराचे संशायस्पद प्रकरण समोर आले आहे. ट्रस्टने याबाबत खुलासा करायला हवा, अशी मागणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली होती.
राममंदिर कार्य हे राष्ट्रीय अस्मितेचे कार्य आहे. अयोध्येतील राममंदिर हे रामभक्तांचा त्याग, संघर्ष व बलिदानातून उभे राहिले. एखाद्या घोटाळ्याचा डाग त्या मंदिरावर पडत असेल तर पंतप्रधान मोदी, सरसंघचालक भागवतांना त्यात हस्तक्षेप करावाच लागेल, असा सल्ला शिवसेनेने दिला आहे.