प्रतिनिधी / कोल्हापूर
महाविकास आघाडी सरकारचे नेतृत्व करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेले जनहिताचे निर्णय आणि राबविण्यात येत असलेल्या योजना जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवा, असे आदेश शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी शनिवारी शिवसैनिकांना दिले. जिल्ह्यात शिवसेना बळकट आहे, पण ती आणखीन बळकट करण्यासाठी जोमाने कामाला लागा, असे आवाहनही पवार यांनी केले.
शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात 12 ते 24 जुलै दरम्यान शिवसंपर्क अभियान लक्ष्य-2022 राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या नियोजनासाठी शनिवारी जिल्हा शिवसेनेची बैठक झाली. यामध्ये जिल्हा प्रमुख विजय देवणे यांनी देखील मार्गदर्शन केले.
संजय पवार म्हणाले, जिल्ह्यात शिवसेना बळकट आहे, ती आणखीन बळकट करण्यासाठी सर्वांनी जोमाने कामाला लागावे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार जनहिताचे निर्णय घेत आहे. जनहिताच्या योजना, उपक्रम राबवित आहे. या निर्णयांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्याचीही प्रत्येक शिवसैनिकांची जबाबदारी आहे. त्याचबरोबर नागरिकांना येणार्या अडचणींची माहिती संकलित करावी. ही सर्व माहिती शिवसेना भवनकडे पाठविण्यात येणार आहे.
शिवसंपर्क अभियान राबवा : विजय देवणे जिल्हा प्रमुख विजय देवणे म्हणाले, 12 ते 24 जुलै दरम्यान जिल्ह्यात शिवसंपर्क अभियान राबवा, त्यामध्ये महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत येथे वॉर्डनिहाय व ग्रामीण भागात जिल्हा परिषदेतील 82 पंचायत समिती विभागात जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, उपतालुका प्रमुख, शहर प्रमुख, शाखा प्रमुख प्रमुख, गट प्रमुख यांच्यासह आढावा बैठका घेऊन तेथे नवीन शाखा, सदस्य नोंदणी करावी.
या बैठकीला माजी आमदार सुरेश साळोखे, माजी जिल्हा प्रमुख विनायक साळोखे, कुंभीचे संचालक संजय पाटील, शहर प्रमुख शिवाजी जाधव, उपजिल्हा प्रमुख सुजित चव्हाण, युवा सेनेचे हर्षल सुर्वे, मंजित माने, राजू यादव, विशाल देवकुळे, विनोद खोत, विराज पाटील, बाजीराव पाटील, अतुल साळोख, स्मिता सावंत, पूजा शिंदे, वंदना पाटील, भारत भापकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
`माझे गाव कोरोना मुक्त गाव’ अभियान ऑगस्टमध्ये
1 ते 8 ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यातील प्रत्येक गावात शिवसेनेच्या गाव शाखा प्रमुखांच्या वतीने `माझे गाव कोरोनामुक्त गाव’ अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात गावात कोरोना लस पोहचली काय?, कोरोना काळातील रेशनचे मोफत धान्य मिळाले काय?, आधारकार्ड सर्व नागरिकांकडे आहे काय?, शासकीय योजनांचा नागरिकांना लाभ मिळतो काय?, नोंदणी झाली आहे काय?, शेतकरी कर्जमुक्तीचा लाभ सर्वांना मिळाला आहे काय?, आदी बाबींवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे.